Wednesday, December 27, 2017

Best Teacher


मनाशी एक धैर्य जोपासले 
त्या दिशेने प्रयत्नही केले 
त्यासाठी दिवस-रात्र एक केले 
मनापासून परिश्रम घेतले 
बुद्धीने ,शक्तीने सारे करून पाहिले 
पण तरी होता होता काहीतरी राहिले 
पूर्णत्वास जाणारे कार्य मध्येच अडखळले
चुकूनच एक चूक झाल्याचे कळून चुकले 
जिंकता जिंकता नकळतच हरले 
त्या हरण्याने मात्र नव्याने उठवले 
त्या चुकीलाही मानून गुरु मैदानी आले
पुन्हा नव्याने मनाशी एक धैर्य जोपासले
त्या दिशेने भरपूर प्रयत्नही केले 
ते ते सर्व केले जे होते मागे केलेले 
पण यावेळी यश हासत हाती आले
कारण 
यावेळी सोबत होती एका नव्या गुरुच्या मार्गदर्शनाची
साथ होती मागे केलेल्या चुकीच्या जाणिवेची
जिद्द होती त्या चुकीला सुधारून बदल घडवण्याची


- रुपाली ठोंबरे

Tuesday, December 19, 2017

गाणी आणि आठवणी

 कसे असते ना ... कधीकधी एखादे ओळखीचे गाणे कानांवर पडते आणि मग त्या गाण्यासोबत कुठेतरी जोडलेली आठवणींची तार अचानक मनावर आपले जाळे विणू लागते आणि मग आपले मन अगदी देह भान हरपून आधी त्या गाण्याच्या आणि नंतर त्यासोबत जुळलेल्या आठवणींच्या अधीन होऊन जाते.  न राहवून अचानक मूड का बदलतो याचे एखादे ओळखीचे पण विशिष्ट गाणे ऐकले हे देखील एक कारण असते असे मी म्हटले तर चकित व्हाल ना? पण माझ्यासोबत तर असे पुष्कळ वेळा होते.अनेकदा गाडीतून जात असताना ,बाजारात चालत असताना किंवा इतर कुठेही वाजणारे एखादे गाणे असे एक हरवलेले तराणे नव्याने वर्तमानात आणण्यास कारणीभूत ठरते आणि पुढे कित्येक वेळ ते या ओठांवरती गुणगुणत राहते...सोबत असते एखादी कुठेतरी दाट वनात गुंजारव करणारी पण आता अचानक स्मरलेली एक आठवण.

त्यादिवशी मुलाच्या नर्सरी सॉन्ग्स च्या लिस्ट मध्ये सुरु असलेले लहानपणीचे 'chubby chicks ... ' ऐकले आणि डोळ्यांसमोर लहानपणची छान हातवारे करत बोबड्या बोलांत कविता म्हणणारी मला मीच आठवली. मराठी माध्यमात असल्याने या इंग्लिश कविता फार कमी कानावर पडायच्या. त्यावेळी गट्टी असायची ती बालगीते आणि बडबडगीतांशी. आजही 'असावा सुंदर चॉकलेटचा बंगला... ', 'ससा रे ससा... ' किंवा ' नाच रे मोरा ... ' ऐकले कि त्या बालगीतांवर नकळत पाय थिरकतात.' ये रे ये रे पावसा... ',लहान माझी बाहुली... ','अटक मटक...' यासारखी बडबडगीते विचित्र हातवारे करण्यास भाग पाडतात.

 माझ्या लहानपणी आमच्या समोरच्या हॉटेलमध्ये सकाळ झाली कि त्या काळची हिट गाणी सुरु व्हायची. तो नव्वदीचा काळ. मैने प्यार किया , साजन , सडक , विश्वात्मा आणि असे कितीतरी त्या काळचे गाजलेले चित्रपट. त्यामुळे आजही कधी कानांवर ' कबुतर जा जा ... ', सात समुंदर पार करके' किंवा ' तुझे अपना बनानेकी कसम... ' या गीतांची धून कानी पडली तरी डोळ्यांसमोर २० वर्षांपूर्वीचे आमचे ते घर आणि त्या समोरचे  त्या काळचे ते आलिशान हॉटेल अगदी जसेच्या तसे उभे राहते. मी दुसरीला असताना आमच्या शेजारी एक मस्त एकत्र कुटुंब राहत होते. त्यांच्याकडे एकदा काही कार्यक्रम होता तेव्हा त्या तरुणांनी ' ही चाल तूरु तुरु, तुझे केस भुरुभुरु... ' इतक्यांदा वाजवले कि हे गाणे म्हणजे माझ्या मनात निर्माण झालेला त्या कुटुंबाच्या आठवणींसाठीचा एक दरवाजाच. आमच्या लहानपणी गणपती म्हटले कि फार मज्जा असायची. त्यावेळी फिरायला जाणे म्हणजे फार मोठे अप्रूप. सायन मधल्या पप्पांच्या एका मित्राकडे आमचा गणपती खूप थाटामाटात साजरा होई. त्या कोळी कुटुंबात आणि सार्वजनिक गणपतीत वाजणारी गणेशगीते आजही गणपतीच्या दिवसांत सायनच्या त्या कोळीवाडयाची सैर करवतात. ''डोल डोलताय वाऱ्यावर... ', ' आम्ही कोली ... ' अशा कोळीगाण्यांवर आमच्या पिढीतल्या प्रत्येकानेच एकदा तरी नृत्य सादर केलेच असेल. 'शेपटीवाल्या प्राण्यांची... ' हे मला माझे पहिले बक्षीस मिळवून देणारे गाणे. त्यामुळे अशी गाणी ऐकली कि मन आपोआपच बाललीलांशी मेळ घालायला सुरुवात करते.आणि आजच्या जगात राहून त्या बालवयात जाण्याचे अजब धाडस ही त्या काळची गाणी करतात.

काही गाणी एखाद्या घटनेशी निगडित असतात तर काही विशिष्ट व्यक्तींशी. प्रत्येकाच्या जीवनातले पहिले गीत असते आईच्या आवाजातले अंगाईगीत. आणि या अंगाईगीताशी आपसूकच आईच्या प्रेमाची नाळ जोडली जाते. 'चांदोबा चांदोबा भागलास का ?' हे सर्वांचे आवडते अंगाई गीत. पण मला कधी माझ्या आईने हे ऐकवलेलं आठवत नाही. पण मला आई आठवते ती बाबांनी लहानपणी माझ्यासाठी घरीच रेकॉर्ड केलेल्या आईच्या आवाजातील बडबडगीतांच्या कॅसेटमुळे. पुढे शाळेत शिकवलेले ' आईसारखे दैवत साऱ्या... ' हे गीत म्हणताना आणि आजही ते ऐकताना आई जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी तीच नजरेसमोर येते. पुढे ' तू निरागस चंद्रमा... ' किंवा बाली ब्रम्हभट्टचे ' तेरे बिन जिना नहीं ...' यासारखी कधीकाळी कोणी डेडिकेटेड केलेली गाणी असो किंवा ' तेरा होने लगा हू... ','मेरी दुनिया है तुझमें कहीं...' सारखी प्रेमगीते आणि ' तू जाने ना... ' सारखे विरहगीत सारेच कोणत्यातरी प्रिय नात्याची आठवण करून देणारी. अशी ही गाणी माणसामाणसांशी असलेले एक विशिष्ट नाते स्वतःच मनात निर्माण करतात ज्यामुळे या गीतांशी आपले असे एक अतूट नटे निर्माण होते. 

पिकनिक आणि गाणी हे समीकरण जसे ठरलेले तसेच त्या गाण्यांशी जुळलेल्या त्या त्या पिकनिकच्या आठवणी हे माझ्या आयुष्यातील एक समीकरण. नववीला आमची पिकनिक गेली होती तेव्हा आमच्या बस ड्रायव्हरच्या मनावर 'दिल तो पागल है' चित्रपटाची गाणी राज्य करत असायच्या त्यामुळे आजही कुठे जरी ' अरे रे अरे वो क्या हुआ ' ऐकले कि त्या पिकनिकमधल्या गंमतीजंमतींसोबतच पुढचा अर्धा तास तरी खर्ची होतो. पिकनिकप्रमाणेच बऱ्याच कार्यक्रमांशी निगडित काही गाणी असतात आणि त्या गाण्यांशी जुळलेल्या काही आठवणी. हल्ली लग्नाच्या विडिओ कॅसेट मध्ये सुंदर गाणी असतात आणि मग पुढे त्या गाण्यांशी तो प्रेमाचा धागा नकळत जुळला जातो. 

खरेतर माझ्या घरी अगदीच कलात्मक असे वातावरण अजिबात नव्हते. लहानपणी कॅसेट आणि रेडिओ यांवर वाजणारी गाणी हाच एक गाण्याशी जवळचा संबंध. तेव्हा ' घन क्रमी शुक्र... ',' श्रावणात घननीळा ... ',' रामा रघुनंदना .. ' अशी भक्तिगीते आणि भावगीते बऱ्यापैकी ऐकिवात होती. पण पुढे अभ्यास आणि टीव्हीवरची हिंदी दुनिया या पसाऱ्यात मराठी गाण्यांसोबत एक वेगळाच दुरावा निर्माण झाला. ती नाळ पुन्हा एकदा नव्याने जुळली ती आशा दीदींच्या आवाजातील ' केव्हा तरी पहाटे... ' या गीतामुळे आणि तेही इंजिनीरिंगच्या चौथ्या वर्षात. आमचा एक मंदार नावाचा मित्र होता. अगदी अफलातून गायचा. त्याच्या आवाजाची मीही एक चाहती होती. तर एकदा असेच कॉलेजनंतर बोलत असताना संगीताचा विषय निघाला आणि तो पुढे 'केव्हा तरी पहाटे ..' या गीतापाशी येऊन थांबला. मी एवढ्या कलाप्रेमींसोबत राहत असूनही माझे गाण्यांचे ज्ञान फारच तुटपुंजे होते. तेव्हा 'हे कोणते गाणे ?' या प्रश्नाचे उत्तर म्हणून मला मराठी गाण्यांची एक CD मिळाली आणि त्या दिवसापासून इतक्या वर्षांपासूनची ती तुटलेली तार पुन्हा एकदा जुळून आली. आणि मग अरुण दाते , सौमित्र ,लता आणि आशा दीदी या सर्वांचा सहवास अतिप्रिय वाटू लागला. संदीप खरेंच्या कवितांसोबत मराठी गाण्यांविषयीचे माझे प्रेम अधिकाधिक दाट होत गेले. या सर्व गीतांचा आणि कॉलेजमधल्या त्या एका भेटीच्या आठवणींचा एक सुंदर पर्वचा आयुष्यात कित्येकदा मनातल्या पडद्यावर उमटून पुसट होत जातो. 

तर अशी ही आठवणी ताज्या करून देणारी गाणी आणि अशा अनेक प्रिय गाण्यांना एका सुंदर बंधनात मनात गुंफून वर्षानुवर्षे रुजलेल्या आठवणी.  हा माझ्या आयुष्याचा अनमोल असा खजिना आहे जो वेळेनुरूप आयुष्यात एक वेगळीच बहर घेऊन येत असतो. आयुष्यात अशी कितीतरी गाणी आहेत ... प्रत्येकाचे स्वतःचेच असे अर्थपूर्ण शब्द , वेगळीच अशी चाल , लय आणि सूरही वेगळाच आणि त्यामुळेच प्रत्येक गाणे असे इतरांपेक्षा आगळे बनते आणि त्यासोबत जुळलेली आठवण देखील अद्वितीय बनते. आज बालपणापासून ते आजपर्यंतची विविध गाणी हा लेख लिहिताना आठवली आणि त्यासोबतच मनात दाटून आला एक वेगळाच आठवणींचा पूर ... विविध भावनांच्या असंख्य सुरांनी भरून निघालेला, वर्षांवर्षांच्या लहानमोठया घटनांना, व्यक्तींना पुन्हा एकदा नजरेसमोर आणणारा , आनंदाच्या असंख्य प्रवाहांना वाट मोकळी करून देणारा. 

- रुपाली ठोंबरे.




 

Wednesday, December 13, 2017

औपचारिक प्रेम

प्रेम... म्हणतात कि देवाने निर्माण केलेली प्रेम ही जगातली एक खूप सुंदर भावना आहे. प्रेमामुळे हे होते, प्रेमामुळे ते होते असे अनेक प्रेमाचे गोड किस्से नेहमीच ऐकिवात असतात. पण प्रेम ही जरी मुख्य संकल्पना असेल तरी जिथे समजूतदारपणा आणि विश्वास या दोन गोष्टींचा अभाव तिथे हेच प्रेम विषारी सिद्ध होते.आणि त्यामुळे उठणारा दाह हा अत्यंत असह्य असतो.

इथे प्रेम म्हणजे फक्तच एक मुलगा आणि मुलगी यांमधील भावनेचा उल्लेख नसून सर्वच नात्यांमधील प्रेमाला संबोधन करावेसे वाटते. आई- मुलं, मावशी, काका-काकू ,बहीण-भावी, सासू-सून, मित्र-मैत्रिणी अशी कितीतरी नाती या समाजात राहताना अगदी सहज आपल्या भोवताली आणि स्वतःत सुद्धा जन्म घेतात. दोन जीवांमधील एक अचानक निर्माण झालेली आपुलकीची भावना म्हणजे प्रेम. तिथे एकमेकांविषयी काळजी वाटणं , अभिमान वाटणं , राग येणं या अगदी सर्रास घडणाऱ्या कृती. कुणावरही हे प्रेम कधीच ठरवून केले जात नाही किंवा जबरदस्तीने करवून घेतलेही जात नाही. आणि जिथे या दोन गोष्टी घडल्या तिथे प्रेम या शब्दाच्या मूळ अर्थालाच तडा गेलेला आढळतो.त्याचप्रमाणे प्रेम ही जर क्षणाक्षणांच्या लहानमोठ्या घटनांनी घडत जाणारी एक उत्तुंग सुंदर इमारत असेल तर समजूतदारपणा आणि विश्वास हे त्या इमारतीच्या पायाचे मूळ स्रोत. जर हा पायाच भक्कम नसेल किंवा काही काळाने त्याला तडा गेली तर ती अतिशय आनंदाने बांधलेली प्रेमाची इमारत ढासळण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो.आणि मग जीवनाच्या नंदनवनात घडलेला हा एक धरणीकंप संपूर्ण जीवन हादरवून टाकतो. 

एखादी नवी नवरी आपली सर्व नाती, स्वप्ने मागे सोडून एका नव्या कुटुंबासाठी सासरच्या घरात पाऊल ठेवते. सुरुवातीला सारेच अनोळखी. हळूहळू त्या औपचारिक नात्यांत मायेचा ओलावा निर्माण होऊ लागतो. आणि प्रेमाचा एक गोड पाझर त्या नववधूच्या जीवनात झिरपू लागतो. या हक्काच्या प्रेमातूनच मग हळुवार नकळतच अपेक्षांची कक्षा रुंदावली जाते. या सर्व नव्या नात्यांत ती नवी स्वप्ने पाहू लागते. त्यांना आपलेसे करू पाहते. आनंदाच्या कारंज्यात प्रत्येक दिवशी न्हात असताना अचानक काहीतरी महत्त्वाचे अचानकच तिच्या हातून हरवून जाते. त्या हरवलेल्या गोष्टीमुळे ती कष्टी असतेच पण तरी त्यावेळी ती तात्काळ डळमळत नाही. कारण... कारण तिच्या सोबत प्रेम असते जे इथे आल्यानंतर तिच्या शिदोरीचा एक भाग बनलेले असते. या ठिकाणी हे प्रेम म्हणजे एक खूप मोठा मानसिक आधार असतो. माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू आमचीच आहेस अशा कितीतरी बोलांनी त्या परिस्थितीतही तो जीव धैर्याने उभा असतो. पण जेव्हा हळूहळू या प्रेमाच्या खोल गर्तेत दडलेल्या स्वार्थीपणाचा ,नुसत्या दिखावूपणाचा , अविश्वासाचा आभास होऊ लागतो तेव्हा मात्र त्या जीवनात खरा भूकंप निर्माण होतो आणि त्यातून पुन्हा उभे राहणे म्हणजे एक नवी सत्वपरीक्षाच. आपले म्हणणारे, आपली काळजी करणारे , आपल्यावर प्रेम करणारे आपल्याला साधे समजूनही घेऊ शकत नाहीत ही एक भावनाच एका कंटकाप्रमाणे मनात सलत राहते. अंधारात चाचपडत असताना अगदी लगेच बाहेर काढण्याचीच गरज असते असे नाही. एखादा विश्वासाचा , प्रेमाचा एक खरा बोल हा देखील जीवनातील पुढचा श्वास घेण्यासाठी पुरेसा असतो. त्या अंधाराला कायमचा नष्ट करणारा प्रकाशमान करणारा दिवा लावणारा मोठ्या मनाचा कुणी आयुष्यात असणं म्हणजे तर खूप थोर भाग्य. पण असो. अशी खरी नाती फार कमी जणांच्या जीवनात येतात. त्यामुळे खरे प्रेम आणि त्यामागची भावना लक्षात घेऊनच विश्वास ठेवणे आणि पुढे अपेक्षा करणे या पायऱ्यांना जीवनात स्थान देणे योग्य. नाहीतर आधी उपेक्षा आणि मग विरोध दर्शवताच होणारा अपमान याशिवाय त्या निरागस जीवाच्या पदरात इतर काहीदेखील पडत नाही. क्षणाक्षणाला जाणवणाऱ्या या मानसिक दडपणामुळे जीव कणकण तुटत राहतो...आतल्या आतच रडत राहतो ज्याचा हुंदकाही कुणाला ऐकू येत नाही किंवा तोपर्यंत सर्वानी आपले डोळे झाकून आणि त्यांच्या कानांत बोटे असतात . आणि मग कित्येक वर्षांपासून उभारलेली ती सुंदर इमारत कोलमडून जमीनदोस्त केव्हा होऊन गेली हे त्या दोघांनाही कळत नाही. 

हे एवढे वाचल्यावर मी अगदीच प्रेमाच्या विरोधात आहे वैगरे असा गैरसमज नक्कीच व्हायला नको. ' प्रेम ही या जगातील सर्वात सुंदर आणि अनमोल देण आहे' यावर मी अजूनही ठाम आहे. फक्त नुसतेच प्रेम काही कामाचे नाही , त्याचा पाया जो विश्वासाने बनला आहे तो आधी पडताळून पाहायला हवा, त्यात तात्पुरता दिखाऊपणा तर नाही ना हे शोधून पाहावे म्हणजे मग ते प्रेम जीवन फुलवणारे एक पुष्प सिद्ध होईल.कारण या जगात खरे पाहिले तर कोणालाही कोणासाठीही वेळ नसतो किंवा तो द्यावासही वाटत नाही. पण अशा नकली प्रेमाचा देखावा करण्याचे साहस मात्र प्रत्येकजण अगदी आनंदाने पार पाडत असतो. त्यात मग असा नियतीमुळे एकटा पडलेला , आधार शोधणारा वेडा जीव उगाच या औपचारिक नात्यांमध्ये बळी पडतो, रुसतो , रागावतो, दुःखी होतो ते सर्व काही करतो ज्यावर त्याचा हक्कच नसतो. आणि मग एकदा असा काही भावनांचा स्फोट होतो ज्यात सर्व जळून खाक होते. त्यामुळे वेळीच खरे प्रेम ओळखून त्यास साथ द्या नाहीतर स्वतःलाच ओळखून एकट्यानेच आयुष्य आनंदाने जगा. 

- रुपाली ठोंबरे.

Friday, December 8, 2017

Happy Birthday !!!



Now a days, I miss those beautiful eyes around me
The eyes...which gets filled with emotions
for my every little wanted- unwanted story.
 
Now a days, I miss that beautiful smile around me
The laughter... which gets bigger and bigger
with every mischievous story of my little one.

Now a days, I miss those beautiful words around me
The words...inspirational, caring, motivating ones
which comes after every chat we had together. 

Now a days, I miss that simplicity around me
a rare nature...with all beautiful qualities 
which is blended with the highest power of understanding.

Now a days, I miss those appreciation around me
The appreciation...for my every little creation
which is a loveliest fuel of my life's engine.

Now a days, I miss that little girl around me
A sweet girl...whom I can call my best friend
and wish a bunch of good wishes for her everyday.
 

Happy Birthday, Ritu !!! 
May God bless you with showers of success and happiness.
Enjoy

- Rupali.

Tuesday, December 5, 2017

सहल छत्रीची

" अरे अरे अरे हो हो जरा हळू ...पण छे ! आपले ऐकणार ती ही माणसे कसली ?
सकाळपासून इथे काय सुरु आहे कोण जाणे ! सारखे इकडच्या गोष्टी उचलून तिथे टाक आणि तिथल्या इथे. माझा सभोवताल पूर्णपणे अस्ताव्यस्त करून टाकला होता या मुलीने . एवढे काय विशेष शोधत होती कधीपासून कपाटात देव जाणे ! असा विचार मी करत असतानाच चांगले खेचूनच मला बाहेर काढले हिने. तिने एकदाचे हुश्श केले पण मी मात्र बाहेर पडताच आ वासला. डिसेम्बर महिना सुरु आहे चांगला थंडीचा , हवेत बऱ्यापैकी गारवाही जाणवतोय, या काळात खरे पहिले तर ना पाऊस असतो ना ऊन ... मग हिला कशी बरे माझी म्हणजे छत्रीची इतकी आठवण झाली असेल. इतके जोरात ओढले मला कि त्या हिसक्याने अंगच दुखायला लागले. मला उघडून , फिरवून वैगरे पाहून झाले आणि पुन्हा काही विचार करत ती कपाटात शोधाशोध करू लागली. मला तर काही उमजेच ना ! काय सुरु आहे हिचे ते. मग पुन्हा एक हिसका देत ओढतच तिने एक गुलाबी रेनकोट बाहेर काढला. गुदमरलेल्या अवस्थेत तो बिचारा कपाटात एका कोपऱ्यात निपचित पडून होता. त्यालाही तिने चांगलेच जागे केले. माझ्यासारखाच तो देखील बाहेर आला तो चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊनच. आम्ही दोघे कधी एकमेकांकडे तर कधी खोलीत इतस्ततः पाहत उभे होतो. टापटीप खोलीत सगळीकडे दिसत होते ते रंगीत स्वेटर्स , उबदार शाली आणि  गोधड्या... हे सर्व असताना आमचे इथे काय काम? हा आम्हा दोघांनाही प्रश्न. खरंच सांगते त्या सर्वांच्यात आम्ही खूप निराळे वाटत होतो. पण आम्ही काही भावना व्यक्त करणार इतक्यात पुढच्याच क्षणी तो या मुलीच्या बॅगेत कोंबला गेला आणि मी तिच्या मुठीत.
" आई मी येते गं "
म्हणत ती घराबाहेर पडली. आणि सोबत मीही हिवाळ्याच्या सुट्टीची मज्जा अनुभवण्यासाठी बाहेरच्या दिशेला वळली. पण कसला हिवाळा न कसली सुट्टी! एव्हाना सकाळचे ८.३० झाले होते पण आकाशात सूर्याचा मागमूसही दिसत नव्हता. पहाटे ५ वाजेचे गार वातावरण दिवसाच्या नको त्या वेळी सर्वत्र जाणवत होते. धुक्यामुळे सर्वच अगदी धूसर... आणि हे काय या अशा धुक्यात चक्क पाऊस. तेच थेंब ... त्याच धारा. आत्ता समजले का आपले असे परत इतक्या लवकर स्वागत झाले ते. आता माझा तिच्यावरचा राग बऱ्यापैकी निवळला पण पावसावर खूप रागावले मी खरेच. चांगली आराम करत होते ना मी ! उगाच हा मध्येच असा कसा येऊ शकतो बरे... स्वतःही असा ना सांगता आला आणि आम्हालाही कामाला लावले. पण आपले परमकर्तव्य लक्षात घेऊन मी तो राग दूर केला. आणि आभाळातुन कोसळणारे गार थेंब जसे अंगावर जाणवले तसे मी लगबगीने पुढे आले. आपला लाल पोपटी रंग दिमाखात मिरवत मी ऐटीत माझ्या मालकिणीच्या डोक्यावर स्थानापन्न झाली. कोंदटलेले सारे श्वास आता मोकळे झालेसे वाटले. इतक्या लवकर अशी अंघोळ पुन्हा मिळेल असे वाटले नव्हते पण या वर्षी ही देखील जादूच. मी जरा वाकून माझ्या बाईसाहेबांच्या कानात पुटपुटले,
" आता ना मान्सून ना पावसाळ्याचे आसपासचे दिवस. मग हा पाऊस कसला?"
यावर ती लगेच उद्गारली ,
" हा पाऊस 'ओखी' वादळाचा."
'वादळ ?'...बापरे ! मला वादळाची तर खूप भीती वाटते. मागच्या वेळी जराश्या हवेत सुद्धा मी पार उलटी होऊन गेली होती. आणि खूप हाल होतात मग माझे. कधी कधी हाडे खिळखिळी होतात तर कधी एखादे फ्रॅक्चर... त्यात यांना वेळ मिळाला तर थोडे उपचार तरी होतात नाहीतर असतेच मी तसेही सोसत.तशी मी शरीराने नाजूकच, पण हे वर्षानुवर्षे इतके उन्हाळे- पावसाळे झेलून फारच सोशिक बनलेय मी.बरे झालेय बाबा, या बयेने रेनकोटदादालाही सोबत घेतले आहे ते. म्हणजे ऐन वेळी माझ्या मालकिणीचे हाल नकोत व्हायला. तशी मागच्या अनुभवानंतर तीही चांगलीच सतर्क झालेली दिसतेय. ते काही असो... पण या ओखीच्या निमित्ताने या वर्षी आमची लवकर ही अशी मनासारखी आंघोळ झाली ते विशेष.एखाद्या सुट्टीच्या दिवसांत नव्या ऋतूच्या देशात मस्त सहल होते आहे असा फील येतोय मला तर... त्या ओखीच्या वादळाचीच कमाल आणखी काय .

पण अरे पावसा , असे सारखे सारखे पावसाळे नको रे दाखवूस. कन्फ्युज व्हायला होते मलापण. अजून खूप वर्षे जगायचे आहे मला.त्यासाठी योग्य झोप हवी ना ! तेव्हा वर्षावर्षाला ये पण तुझ्या वेळीच. आता जरा आराम करू दे मला. "


- तुमचीच प्रिय विश्वासू ,
  एक छत्री. 

- रुपाली ठोंबरे .

Monday, December 4, 2017

बालमैफल -१

बालमैफल -१
 माझी लोकसत्ता मध्ये आलेली पहिली कथा.


वाचण्यासाठी लिंक :
एका चित्राची गोष्ट
 

Friday, December 1, 2017

मला भावलेली झी मराठी वरील मालिका


"श्वास तू ध्यास तू , मैत्रीतील बंध तू..... झी मराठी ,मी मराठी "

म्हणत घराघरात पोहोचलेली 'झी वाहिनी' आज अख्या महाराष्ट्रभर प्रत्येकाच्या घराघरांतून डोकावतेय . आज खरेतर ढीगभर प्रसारवाहिन्या आणि त्यावर सुरु असलेल्या शेकडो मालिकांचे जाळे दूरचित्रवाणीवर जरी पसरलेले असले तरी अनेक मध्यमवर्गीय मराठी ज्ञात कुटूंबामध्ये हमखास आवडीने पाहिली जाणारी वाहिनी आहे - 'झी मराठी'. आमचे घरही याला अपवाद नाही, बरे का ? माझे लग्न झाले, सासरी आले आणि सासरच्या नव्या नात्यांसोबतच एक नवे नाते जीवनात निर्माण झाले ते झी मराठी सोबत, कारण इथे सर्वांचीच ती अतिशय प्रिय. 'दिल्या घरी तू सुखी रहा' ,'होणार सून मी त्या घराची', 'अस्मिता' , 'राधा ही बावरी' ,'जय मल्हार' यांसारख्या जुन्या मालिका असोत वा आता सध्या सुरु असलेल्या 'काहे दिया परदेस','लागिरं झालं जी' , ''तुझ्यात जीव रंगला ' यांसारख्या नव्या मालिका असोत, या सर्वच दर्शकांवर त्यांची छाप पाडण्यात यशस्वी झाल्या आहेत. आमच्या घरी तर रोज संध्याकाळी ६.३० वाजता 'दार उघड बये , दार उघड ' म्हणत झी मराठी आमच्या दूरचित्रवाणीवर अवतरते ते रात्री ११ वाजता 'जागो मोहन प्यारे ' म्हणत ती निरोप घेते.

झी मराठी वरची प्रत्येक मालिकाच जरी खूप सुंदर असली तरी मला त्यामध्ये भावलेली मालिका म्हणजे - 'माझ्या नवऱ्याची बायको '. सुरुवातीला या अजब शीर्षकामुळे या मालिकेबद्दल एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती आणि त्यामुळेच अगदी पहिल्या भागापासून पाहिलेल्या मालिकांच्या सूचीमध्ये तिचा समावेश झाला. एक्स्ट्रा मॅरिटेल अफेअर हा सध्याच्या समाजातील एक गंभीर तितकाच नाजूक प्रश्न ज्या सहजपणे आणि कल्पकतेने यात मांडला आहे ते खरेच वाखाणण्याजोगे. चित्रपटसृष्टी असो वा मालिका... हा विषय दर्शकांसाठी निश्चितच नवा नाही पण तरी याच विषयाला घेऊन एक वर्षांपूर्वी दर्शकांसमोर आलेल्या या मालिकेने सर्वांच्या मनात घर केले  ते तिच्या अप्रतिम मांडणीमुळे आणि मालिकेतील कलाकारांच्या समर्पक अभिनयामुळे.यात कुठेही अति भडकपणा नाही किंवा रेंगाळत एकाच जागी थांबलेले नकोसे वाटणारे प्रसंग नाहीत. सुरु झाल्यापासून ती संथपणे वाहतेच आहे एका नदीप्रमाणे...आपल्यातील गुणांनी दर्शकांना तृप्त करत. आणि जसजसे कथानक फुलत गेले ते अधिकाधिक सुंदर होत गेले यात शंकाच नाही.

खरेतर 'माझिया प्रिंयाला प्रीत कळेना ' नंतर अभिजीत खांडकेकरला या अशा भूमिकेत पाहणे म्हणजे जरा जीवावरच आले होते . पण इथेही त्याने आपल्या भूमिकेला अचूक न्याय दिला आहे.पत्नी सोडून इतर प्रेमप्रकरण यासारखे चुकीचे काम करायचेही आहे आणि ते करण्यासाठी सुरु असलेला गुरूचा आटापिटा ,पुढे नंतर प्रत्येक वेळी कुठेतरी अडखळून तोंडघाशी पडायचे अन नको तो मनस्ताप डोक्याला लावून घ्या ... पण तरी कुत्र्याच्या शेपटासारखे सरळ न होणारी माणसाची अशी एक जात त्याने आपल्या अभिनयातुन अतिशय प्रबळतेने समोर सादर केली आहे. अशावेळी अशा या गुरूचा राग येत असला तरी कित्येकदा त्याची कीवच येते. यातले एक आणखी मजेदार पात्र म्हणजे शनया. खरेतर शनया हे या मालिकेतील एकमेव खलनायिकेचे पात्र पण इतर खलनायिकांप्रमाणे हिचा कायम राग राग होतच नाही उलट ती मजेशीर वाटते ते तिच्या प्रत्येक प्रसंगी होणाऱ्या फजितीमुळे.गॅरीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याइतकी शहाणी, काहीशी बालिश , आळशी आणि कायम इतरांच्या पैशांवर अवलंबून राहून स्वतः मौजमस्ती करू पाहणारी ही  स्वार्थी प्रेयसी, रसिकाने अतिशय सुंदरतेने साकारली आहे. राधिका हे या मालिकेतील महत्त्वाचे पात्र आहे म्हणूनच नव्हे तर ते पात्र मला अधिक भावते ते ती कित्येकजणींसाठी एक प्रेरणा ठरणारी व्यक्तिरेखा आहे म्हणून . अनिता दातेने साकार केलेली राधिका... एक अतिशय सुंदर ,साधी , सरळ पतिव्रता गृहिणी... घराच्या पसाऱ्यात स्वतःचे अस्तित्व शोधून ते मानणारी, कायम जवळच्यांच्याच नव्हे तर अगदी परक्यांच्याही मदतीला धावून जाणारी, नवऱ्याचे बाहेर सुरु असलेले प्रेमप्रकरण समजल्यावर भावुक होणारी पण तरीही नुसती हार मानून रडत बसण्यापेक्षा त्यातून नवा मार्ग शोधणारी, या शनयारुपी आलेल्या वादळाला अगदी हुशारीने आणि धैर्याने सामोरी जाणारी, परिस्थितीमुळे हतबल होण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करू पाहणारी... एक भविष्यातली उद्योजिका जी आज पुणे मुंबईच नव्हे तर अगदी सिंगापूरपर्यंत एकटी जाऊ शकणारी. ती व्यक्तिरेखा पाहून खूप काही शिकावेसे वाटते. 'एखाद्या स्त्रीने मनात आणले तर ती सर्व काही करू शकते' हा मंत्र या मालिकेतून नक्कीच घेण्यासारखा आहे.

 'माझ्या नवऱ्याची बायको' हे कथानक प्रामुख्याने जरी या ३ व्यक्तिरेखांभोवती फिरत असले तरी त्यातील प्रत्येक प्रसंग जिवंत होतो तो या मालिकेतील इतर पात्रांमुळे मग ते राधिकाच्या मदतीला धावून येणारे आई-बाबा,आनंद ,जेनी असो ,सोसायटी मधले नाना-नानी  ,रेवती असो वा शनायाचे स्वार्थी मित्र. एकूण पाहता एक अतिशय गंभीर, एखाद्याच्या आयुष्यात वादळ घेऊन येणारा प्रश्न आणि त्यावरची उत्तरे अगदी हलक्या फुलक्या रीतीने प्रेक्षकांसमोर साकारल्याबद्दल या मालिकेचे दिग्दर्शक ,लेखक ,कलाकार अगदी सर्वांचेच मनापासून आभार मानावेसे वाटतात. आणि या यासोबतच या मालिकेच्या भवितव्यासाठी सर्वाना खूप खूप शुभेच्छा. शनया किंवा गुरुनाथ सुधारतील की नाही ते माहित नाही पण येणाऱ्या प्रत्येक प्रसंगातून राधिकाची नक्कीच प्रगती होत जाईल आणि तिच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच नवे काही शिकायला मिळत जाईल.

- रुपाली ठोंबरे. 


Blogs I follow :