Wednesday, December 28, 2016

New year with new vision



नवे वर्ष...नवी दृष्टी... नवे विचार... नव्या कल्पना !!!
आणि या सोबतच या नव्या वर्षात भर पडते आहे ती आजच्या नव्या पिढीसाठी एक नवी दिशा घेऊन आलेल्या अक्षयाच्या नव्या अक्षरांच्या प्रदर्शनाची....
प्रत्येकाच्या आयुष्यात या नववर्षाच्या सोहळ्यात २०१७ साल नव्याने उजाडेल...नवे निश्चय आणि नवी आशा घेऊन. आणि याच नव्या वर्षीच्या पहिल्याच आठवडयात म्हणजे ३ जानेवारी २०१७, मंगळवारी, "नेहरू सेंटर आर्ट गॅलरी" येथे प्रख्यात सुलेखनकार ' अच्युत पालव' यांच्या मार्गदर्शनाखाली कॅलिग्राफीच्या क्षेत्रात समृद्ध होत असलेली अक्षया ठोंबरे, कॅलिग्राफीच्या क्षेत्रात असणारे तसेच या क्षेत्राशी फारसा संबंध नसणारे अशा सर्वांसाठीच हा चित्तवेधक विषय नव्याने तिच्या स्वतःच्या शैलीत मांडून हे अक्षरप्रदर्शन घडवून आणत आहे.

अक्षया ठोंबरे ही अक्षरांच्या विश्वातील कल्पना आणि त्यांतील सौन्दर्याने  प्रेरित झालेल्या नव्या पिढीच्या सुलेखनकारांपैकीच एक आहे. तिचे काम हे खूप विस्मयकारक आहे. पारंपारिक ढंगातील अक्षरांना तिने दिलेला आधुनिकतेचा स्पर्श प्रेक्षकांसमोर सुंदरतेचा एक नवा अविष्कार निर्माण करतो. अक्षयाने तिच्या या प्रदर्शनासाठी अजोड मेहनत घेतली आहे.या प्रदर्शनातील चित्रे आणि त्यांतील अक्षरे म्हणजे तिची मेहनत , तिच्या भावना , तिचे मन या सर्वांचा आरसा आहे. " New year with new vision" या अक्षयाच्या प्रदर्शनासोबत भारतीय अक्षरशैलीला पुढे समृद्धीस नेणारा एक उमदा कलाकार मिळणार असे अक्षयाचे गुरु अच्युत पालव अगदी ठामपणे सांगतात.

या अक्षर प्रदर्शनाबद्दल बोलताना अक्षया सांगते कि , 
"अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी" मधून एक विद्यार्थीनी म्हणून सुलेखनाचे मूलभूत धडे घेत असताना तिला अच्युत पालव सरांचे उत्तम मार्गदर्शन आणि प्रोत्साहन  लाभले. मूळ अक्षरांचा वारंवार सराव करत  तिने सुलेखनाचा पाया भक्कम केला.यासोबतच जसजशी तिची अक्षरांबद्दलची ओळख वाढू लागली तिने   Roundhand, Gothic , Fraktur ,unicial  अशा वेगवेगळ्या शैलीतील अनेक पारंपरिक रोमन अक्षरांचा अभ्यास सुरु केला.अक्षरांच्या या प्रवासात असतानाच Gothic आणि Fraktur या शैलीतील अक्षरे तिच्या मनाला विशेष भावली.त्यांच्यातील चलन, गती, ताठपणा इत्यादींचा अभ्यास करताना तिला या टंकांसोबत काम करायला आवडू लागले.Gothic आणि Fraktur या दोन शैलींचे एकत्रीकरण करून स्वतःचे असे काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा सफल प्रयत्न आजपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय सुलेखनकारानी केला आहे. याच Black letter च्या संकल्पनेतून अक्षयाने Gothic आणि Fraktur या दोन शैलींचे एकत्रीकरण करून, तिचे स्वतःचे कौशल्य वापरून आणि कॅलिग्राफीमधील बेसिक अक्षरांचा स्पर्श देऊन स्वतःचे असे एक नवे प्रतिरूप तयार केले आहे. या Black letterच्या नव्या प्रतिरूपामधून तिने स्वतःची एक ओळख, स्वतःची जागा निर्माण केली.मूलतः Gothic आणि Fraktur मध्ये असलेली खूप सारी अक्षरे ओळखणे कठीण जाते आणि त्यामुळे सामान्य माणूस त्या अक्षरांसोबत,शब्दांसोबत एकरूप होऊ शकत नाही. अक्षयाच्या अक्षरांत तिने gothic चा स्पर्श तसाच ठेवला असल्याने त्यांची ओळख थोडी कठीण असली तरी तिने सामान्य माणसाला समजू शकेल या विचारातून तिच्या शैलीत ते सोपे करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. या अक्षर प्रदर्शनात ती फक्त अक्षरांपर्यंतच सीमित राहिली नसून तिने अक्षरांसोबतच वेगवेगळ्या रंगांबरोबर, वेगवेगळ्या माध्यमांसोबत रंगांचे विविध पोत,ऍबस्ट्रॅक्ट रूप आणि चित्रकलेच्या विविध तंत्रांमध्ये आपले बदल घडवून आणत भरपूर काम केले आहे.हे करताना चित्रकार कुलदीप कारेगावकर सरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा सिंहाचा वाटा आहे. कोणताही आकार हे एक डिझाईन आहे असे ती मानते. तिच्या मते,एखादे अक्षर हे सुद्धा एक प्रकारचे डिझाईनच आहे. विविध अक्षरे योग्य ठिकाणी तोडून आणि हव्या त्या ठिकाणी जोडून निर्माण होणाऱ्या अद्वितीय विलीनीकरणातून कितीतरी विलक्षण रचना अक्षयाने तिच्या चित्रांत साकारल्या आहेत.

असे कितीतरी जण आहेत ज्यांना अजूनपर्यंत कॅलिग्राफी म्हणजे नक्की काय तेही माहित नाही.पण अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर कॅलिग्राफी म्हणजे सुंदर अक्षरलेखन. अक्षरलेखन हा विषय खरेतर अगदी बालपणापासून आपल्या परिचयाचा पण कित्येकांच्या आयुष्यात हा विषय केवळ नाममात्र राहतो. अक्षयाच्या या प्रदर्शनातून कधीतरी अक्षरांबद्दल असलेली ओढ पुन्हा नव्याने जागृत होऊ शकेल.आणि जे अक्षरलेखनाबद्दल आधीच जागृत आहेत त्यांना या प्रदर्शनातून अक्षरलेखन म्हणजे फक्त सुंदर हस्ताक्षरच नव्हे तर त्या पलीकडेही असलेले सुंदर विश्व दिसेल. जे आहे त्यालाच चिकटून न राहता अक्षयासारखे नवे प्रयोग , नवे काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होईल. अक्षरलेखनामध्ये आणि त्यासोबतच स्वतःमध्ये नवे काही शोधून काढून योग्य अन्वेषण घडवून आले कि आपोआपच दोघांचीही वाढ होईल. हेच उद्दिष्ट मनाशी बाळगून प्रत्येकाने अक्षयाचे  " New year with new vision" हे अक्षरप्रदर्शन एकदातरी पाहायला हवे. घरी परत जाताना खूप काही नवे अनोखे असे कधीही न अनुभवलेले घेऊन जाल यात शंकाच नाही.


- रुपाली ठोंबरे.

Friday, December 23, 2016

भूक


आयुष्यात कितीही कष्ट असतील तरी चेहऱ्यावर एक निरागस स्मित घेऊन वावरणारी एक चिमुकली.
खरेतर १०-१२ वर्षांची ही मुलगी.
तिचे हे वय खेळण्याबागडण्याचे, हवा तो खाऊ खाण्याचे,छान छान कपडे घालून खुश होण्याचे.
पण यांपैकी एकही गोष्ट पूर्णपणे तिच्या नशिबात नाही.
गरीब शेतकऱ्याची मुलगी.आई-वडील दोघे दिवसभर शेतात राब राब राबतात.
त्यांनाच हातभार लावण्याची धडपड करणारी ही चिमुरडी सकाळीच आईने दिलेला हिरव्यागार भाज्यांचा ताटवा घेऊन बाजारात जाणारी... ५ रुपये जुडी , ३ रुपये वाटा करत गावभर हिंडणारी....संध्याकाळी थकूनभागून घरी परतणारी...बाबांच्या हातावर दिवसाचे पैसे ठेवत त्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारी.
या वयात असे जगणे... पण चेहरा मात्र प्रसन्न... कुठलीही चिंता नाही... उलट एखादे भाव दिसलेच तर ते असतील समाधानाचे,आनंदाचे....या जगण्यातूनही जे हवे ते मिळवत असण्याचे समाधान.
टोपलीत हिरव्यागार ताज्या भाज्यामधून डोकावणारी २ पुस्तके तिची खरी आवड दर्शवतात. गिऱ्हाईकांची गर्दी ओसरल्यावर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ती त्या पुस्तकांमध्ये दडलेल्या ज्ञानाची चव घेण्यास आतुर असे. पुस्तकांबद्दल असलेल्या आपुलकीसमोर तिला खेळणे,खाऊ ,कपडे अशा गोष्टी नगण्य वाटत होत्या. आणि हेच कारण होते या परिस्थितीतही चेहऱ्यावर पसरलेल्या आनंदाच्या लहरींचे. आपल्या वयाच्या इतर मुलांना जे काही मिळते त्याबद्दल ना कोणता हेवा आणि आपल्या नशिबात ते सुख नाही त्याबद्दल ना कोणती खंत. पण जी शिदोरी नेहमी तिच्यासोबत आहे ती कदाचित इतरांना सहज उपलब्ध असूनही त्यांना त्याची किंमत नसेल.पण या पुस्तकांतूनच माझे उद्याचे भविष्य  उज्ज्वल होईल हे मात्र त्या चिमुरडीला लहान वयातच उमगले असेल आणि ज्ञानाची असलेली हीच भूक तिला उदयाला यशस्वी करेल. एखाद्या गोष्टीची मनापासून आस ठेवली कि तो घेतलेला ध्यास स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्ण होईलच हे मात्र सत्य.

चालता चालता बाजारात दिसलेले एक दृश्य...एका चित्रकाराने कागदावर टिपलेले हे चित्र खरंच किती काही बोलून जाते... आपल्यासारख्यांना किती काही शिकवून जाते, नाही का ?

- रुपाली ठोंबरे.



चित्रसौजन्य  : हेमंत भोर.

Thursday, December 15, 2016

तुझ्या विना....मी?

                     

                                                                                                                                                               

  कितीदा नव्याने तुला पाहते मी
  कितीदा नव्याने तुला जाणते मी
  तुला पाहते मी
  तुला सांगते मी
  तुझ्या विना अर्थ नाही जीवनी
  तुझ्या विना सांग "जगू कशी मी?"

   तुझ्या प्रीतीची प्यास डोळ्यांत वाहे
  तुझ्या सोबतीची मला आस आहे
  तुझ्या आठवणींत माझ्या सख्या रे
  क्षणमाला निरंतर ही मीरा जपते रे

   जीव भिजतो बघ रोज हा उशाशी
  तू ये धावून आता तरी मजपाशी
  येऊन सारे उधळून सुख रंग तारे
  देऊन सारे तू न कधी परत जावे

   कितीदा नव्याने तुला पाहते मी
  कितीदा नव्याने तुला जाणते मी
  तुला पाहते मी
  तुला सांगते मी
  तुझ्या विना अर्थ नाही जीवनी
  तुझ्या विना सांग "जगू कशी मी?"

                                               - रुपाली ठोंबरे.

Wednesday, December 14, 2016

घुसमट

कधीकधी अशी वेळ येते जेव्हा भोवतीचे सारे जग अंधारलेले वाटते... अनेकदा आपले जवळचेही साथ देत नाहीत असे वाटते. तेव्हा आपोआपच बाहेरच्या जगात आधार शोधला जातो... कुठेतरी कधीतरी तो सापडतोही... हा नवा आधार एखादी व्यक्ती असू शकते किंवा एखादी नवी संधी जी आपले जग बदलून टाकेल आणि त्या काळोख्या जगातून बाहेर काढेल. पण खूपदा जे ठरवतो ते होतेच किंवा मनासारखे मिळतेच असे नाही. या नव्या संधीसोबत बऱ्याचदा वेगळा अनुभवही येतो जो  मनाला काही केल्या पटत नाही... कदाचित तो एखाद्या दुसऱ्या व्यक्तीनुसार बरोबरही असेल पण आपल्या बुद्धीला पटत नाही म्हणून तो वाईट अनुभव.आणि याचे एक वेगळेच जड ओझे मनावर निर्माण होते. आणि जेव्हा अशा वाईट अनुभवांची मालिका आयुष्यात दीर्घ होते तेव्हा जीव ज्याप्रकारे कासावीस होतो... तीच असते घुसमट.



     अंधाऱ्या बंद खोलीत
    अडकून पडलेला जीव
    सारी कवाडे तोडून
    बाहेर उडू पाहतोय
    आपल्याच घराच्या भिंती कधी
    आपलीच साथ देईनाश्या होतात
    काळोखात चाचपडत जीव तेव्हा
    क्षणाक्षणाला आत गुदमरत राहतो
    पडद्याआडून मग कधीतरी दिसतो
    एक किरण नव्या आशेचा,
    आणि मग नकळतच
    विश्वासाचा एक धागा
    अवचित जुळून येतो भाग्याचा
    त्या अंधाऱ्या खोलीत
    एक काजवा चमकू पाहतो
    विशाल सूर्याच्या प्रकाशात
    नवस्वप्नांचे मनोरे रचू लागतो
    अचानकच त्या किरणासोबत
    धुळीचा लोट वाहू लागतो
    मनाच्या गाभाऱ्यात न सांगता
    एक काळा ढग गर्दी करू पाहतो
    जीव गुदमरतो, आकांत करतो
    पुन्हा एकदा होऊन एकाकी
    त्या काळोखात तो चाचपडत राहतो
    पुन्हा नवा किरण शोधण्यासाठी
    प्रदूषणातही नव्याने जगू पाहतो
    काळ लोटला जातो तसे
    असे अनेक अनाहूत काळे ढग
    आसपास - आतबाहेर चोहीकडे
    पसारा करून जमत असतात
    जीव आता पुरता अडकून जातो
    गुदमरत राहतो , घुसमटत राहतो
    आसवांच्या पावसात भिजत राहतो
    पण तरी पुन्हा एकदा
    अंधाऱ्या बंद खोलीत
    अडकून पडलेला जीव
    सारी कवाडे तोडून
    बाहेर उडू पाहतोय

                                          - रुपाली ठोंबरे.



Monday, December 12, 2016

अक्षरयज्ञ-३

आसपास दृष्टीस पडतील ती फक्त नाना तर्हेची हिरवीगार झाडे, कानांना ऐकू येईल फक्त पोपट, चिमण्या आदी पक्षांची मधुर किलबिल आणि सोबतीला असेल अगदी नाजूक स्पर्शाने अंगाशी बिलगून जाणारा मुग्ध गारवा... अशी जागा मुंबईच्या कुशीत सापडणे खरेतर अशक्य. पण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने ते शक्य करून दाखवले आहे. आज आमच्या सारख्यांना या नयनरम्य परिसराचे दर्शन घडू शकत आहे ते फक्त अच्युत पालव सरांनी आयोजित केलेल्या 'अक्षरयज्ञ-३' या ३ दिवसांच्या नवरस या गहन विषयावर आधारित कार्यशाळेमुळे. कॅलिग्राफीच्या जगतात प्रवेश केलेले त्यांचे सुमारे ५० विद्यार्थी आज इथे मोठया उत्साहाने जमले आहेत. निसर्गाच्या प्रेमात पाडणारी शांत जागा, सर्वांचा लाडका गुरु आणि नवरसासारखा भावनाप्रधान विषय या त्रिवेणी संगमामुळे सर्व विद्यार्थी फारच उत्सुक होते.


आज कार्यशाळेचा पहिला दिवस. मुंबई, अमरावती ,गुजरात, सावंतवाडी अशा निरनिराळ्या भागांतून आलेले सर्वजण राहण्याची सोय आणि न्याहारीचा आस्वाद घेऊन उत्साहात हॉलमध्ये जमले. काम करण्याची जागाही अतिशय सुंदर... प्रशस्त, हवेशीर, मोकळी आणि प्रकाशाची कमी नसणारी.कार्यशाळेचे उदघाटन झाले ते प्रसिद्ध कथक नृत्यांगना तन्वी अनिल पालव हिच्या नवरसांनी न्हाऊन निघालेल्या नृत्याने. तिच्या नृत्यातून आणि चेहऱ्यावरच्या हावभावांतून ओसंडणारा प्रत्येक रस आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर त्याची अचूक छबी उमटवून जात होता. तो खरंच एक सुंदर अनुभव होता. त्यानंतर सर्वांच्या आवडत्या विवा सरांनी रांगोळीचे सप्तरंग असे काही जमिनीवर उधळले कि नवरसांचे ठसे प्रत्येकाच्याच मनावर उमटू लागले. आणि या रंगांसोबत आमचा या ३ दिवसांच्या कार्यशाळेचा प्रवास सूरु झाला.

त्यानंतर सुरुवातीलाच अच्युत सरांनी विविध ब्रशेस, साहित्य या सर्वांशी निगडित प्रश्नउत्तरांचा कार्यक्रम ठेवला. अनेक प्रश्नांची उत्तरे थेट कागदावर त्यांनी उमटवली होती. इंजेक्शची सुई असो वा एखादा घरगुती वापरातला ब्रश, कॅलिग्राफीच्या दुनियेतले एखादे टूल असो वा रस्त्यावरून उचललेली एखादी दगडाची चिप.... अच्यूत सरांच्या हातून कागदावर एखादा जादुई स्ट्रोकच निर्माण होईल. आज म्हणूनच कॅलिग्राफीच्या जगातले एक उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख सर्वत्र आहे .

दुपारच्या चहानंतर संगीतकार , कवी आणि चित्रकार या तिन्ही रूपांत साहित्यक्षेत्रात वावरणारे मिलिंद जोशी आमच्या समोर उभे होते.... काहीतरी नवे घेऊन. त्या नुतनतेची उत्सुकता सर्वांनाच होती पण ते नक्की काय असेल हे मात्र आमच्यासाठी गूढच होते, जे काही क्षणांतच आमच्यासमोर उलगडले गेले. एक सुंदर त्यांचीच संगीतबद्ध केलेली धून सर्वांच्या कर्णपटलांवर राज्य करू लागली. या संगीताला  मनातून अनुभवून समोरच्या कागदावर चित्रबद्ध करण्याची अतिशय अवघड कामगिरी आमच्यावर होती. सुरुवातीला तर कित्येकांना काहीच सुचले नाही. कितीतरी कागद कोरेच होते. पण हळूहळू प्रत्येक नव्या संगीतफ़ितीसोबत एक नवा रस मनात वाहू लागला. कधी तो संथपणे मनात तरंगत होता तर कधी थैमान घालून उसळत होता.कधी प्रेमाची रासलीला सुरु होती तर कधी भयाने व्याकुळ झालेला जीव सैरावैरा धावत होता. आता आम्ही सुद्धा या रसांना व्यक्त करण्यास सुरुवात केली आणि कोरे कागद सुंदर, भडक रंगानी आणि अंतर्भावांतून उत्पन्न झालेल्या रसांनी रंगू लागले. कोणी चुकले तर कोणी बरोबर होते ... पण प्रत्येकाचे प्रयत्न मात्र निरंतर सुरु होते. शांत ,वीर शृंगार, भक्ती , भय या रसांचे चित्र आज प्रथमच मी कागदावर पाहत होते आणि तेही स्वतःच्या हातून साकारलेले.

त्यानंतर थिएटर दिग्दर्शक शिवदास घोडकेंसोबत आमची नवी शाळा सुरु झाली... शाळा अभिनयाची. कधीही न अनुभवलेले आज आम्ही शिकत होतो.प्रत्येक कलेमध्ये निपुण होण्यासाठी एक खूप मोठी प्रक्रिया असते हे या कार्यशाळेतून घेण्यासारखे होते. त्या प्रक्रियेचा एक भाग बनून मेहनत घेतली कि नक्कीच यश दूर नसेल . थिएटर... खूप खूप मजेदार भाग होता या कार्यशाळेचा. सर्वानी खूप मज्जा केली. अभिनयामध्ये दडलेले नवरस आज आमच्यासमोर मांडले गेले आणि तेच स्वतःच्या अभिनयातून सर्वांसमोर मांडण्याचा नवा उपक्रम सुरु झाला. या उपक्रमात कार्यशाळेतील इतर १० जणांसोबत मिळून नाटक प्रस्तुत करायचे होते आणि त्यातूनच ओळखी-अनोळखी सर्वांसोबतच  एक नवा संवाद सुरु झाला. आपापल्या परिने सर्वानीच छान काम केले. पण ते निश्चितच घोडके सरांच्या मनासारखे नव्हते. पण पुढे त्यांच्या मार्गदर्शनासाठी उभारलेले शोकसभेचे,करूण  रसाचे चित्र सर्वांच्याच लक्षात राहील. अप्रतिम झाले होते ते.रात्रीच्या साध्या पण चविष्ट जेवणानंतर विद्यार्थ्यांपैकीच पण आज स्वतःच्या मेहनतीच्या बळावर स्वतःचे अस्तित्त्व निर्माण करणाऱ्या भालचंद्र लिमये आणि अक्षया ठोंबरे या दोघांच्या कॅलिग्राफीच्या कामाचे सादरीकरण झाले. दोघांचेही कामाचे स्वरूप , पद्धत , विषय एकमेकांपेक्षा वेगळे असल्याने २ नव्या गोष्टी शिकण्याचे, बघण्याचे भाग्य आम्हांस लाभले .लिमयेचें काम कवितांच्या सानिध्यातले होते... खूप सुंदर आणि खूप बोलके. अच्युत सर आणि विवा सर यांच्यानंतर या कार्यशाळेत आम्हा विद्यार्थ्यांना बी जी सर हे एक उत्तम मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यासाठी खरेच मनापासून त्यांचे आभार मानावेसे वाटते. अक्षयाचे काम तर खूप सुंदर आणि प्रेरणादायी होते. प्रबळ इच्छाशक्ती, मेहनत आणि अच्युत पालव सरांचे मार्गदर्शन या तिन्ही गोष्टींचा मेळ तिच्या प्रत्येक चित्रात जाणवत होता. थरांवर थर घेऊन मांडलेल्या विशिष्ट शैलीतील अक्षरांनी अक्षयाने सर्वानाच मंत्रमुग्ध केले होते. आणि हीच जादू तिच्या ३ जानेवारीला मुंबईत असलेल्या तिच्या चित्रांच्या प्रदर्शनातही दिसून येईल यात शंकाच नाही. अशाप्रकारे आजचा पहिला दिवस हसत-खेळत पार पडला.

दुसरा दिवस सुरु झाला तो लेखिका आणि निवेदिका म्हणून सर्वज्ञात असलेल्या अक्षदा विचारेंसोबत. त्या आदल्या दिवसापासूनच सोबत असल्यामुळे आमच्या मनातील नवरसांबद्दलचे विचार थोडेफार त्यांना समजून आले होते. आम्हाला रसांविषयी शाब्दिक माहिती देऊन त्यांनी आमच्या विचारांना खतपाणी घालून एक पोषक वातावरण निर्माण केले. आज विविध रसांविषयी अधिक माहिती मिळवण्यात आलेले यश पुढे आमच्या कामातून दिसून आले. कॅलिग्राफीमध्ये आजपर्यंत बेसिक शिकताना एका साच्यात काम करत होतो पण या कार्यशाळेत ते सर्व बंध मुक्त करून स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळाली होती.कविता, गाणी अर्थात शब्दांच्या माध्यमातून आम्ही रसांच्या अगदी जवळ जात होतो, त्यांना समजून घेत होतो,कागदावर त्यांचे ठसे उमटवून विचारांची छाप सोडत होतो. शृंगार ,भय,बिभत्स, रौद्र अशा सर्व रसांना शब्दांतून समजून घेणे आणि कागदावर व्यक्त करणे... हा एक खूप सुंदर अनुभव होता. खासकरून बिभत्स रस कागदावर व्यक्त करताना आलेले अपयश आणि पुढे मिळालेले मार्गदर्शन नक्कीच आपल्या सर्वांच्याच लक्षात राहील. आजच्या दिवसात अनुभवलेला आणखी एक सुंदर अनुभव म्हणजे ओमकारातून प्रत्येकाने शोधलेला आपापल्या अंर्तमनातील ओम... नेहमीच्या बघण्यातल्या ओमपेक्षा खूप वेगळे स्वरूप होते ते ... जे आपणच स्वतः मांडले होते यावर आपलाही आता विश्वास बसणार नाही कदाचित. त्यानंतर 'लय भारी ' चित्रपटातील 'माऊली माऊली...  ' गाण्यावर सरांसोबत सर्वच अगदी देहभान हरवून नाचले... जणू त्या भक्तिरसात, त्या जयघोषात स्वतःला हरवून घेतले होते. पुढे हाच भक्तीरस प्रत्येक कागदावर ओसंडून वाहत होता. सर्वाना हा प्रकार फारच आवडला. पुन्हा एक नवे गाणे सुरु झाले... २०१६ मधले सैराट गाणे अबालवुद्धांपासून सर्वानाच नाचवणारे... 'झिंग झिंग झिंगाट... '. यावेळी नाचतानाची झिंग प्रत्येकाच्या वयोमानानुसार वेगवेगळी होती जी कागदांवर रंग उधळत बेभान झाली होती. त्यानंतर चहासोबत झालेल्या गप्पांमधून कार्यशाळेत दडलेले कित्येक कलाकार समोर आले. आमच्याकडे कवीही होता आणि गायकही ... जादूगारही होता आणि नायकही. याच नायकाच्या अधिपत्याखाली आम्ही सर्व आज बहरत होतो.



आजच्या दिवसातील आणखी एक आकर्षण म्हणजे कुलदीप सरांचे प्रात्यक्षिक. कुलदीप सरांचा निळ्या ,पांढऱ्या रंगांत भिजलेला कुंचला जसजसा कोऱ्या कॅनव्हासला स्पर्श करू लागला त्या चित्रातला शांतपणा आमच्या चेहऱ्यांवर सौम्यलहरी बनून पसरत होता.सकाळच्या संथ सागरावर शितल चंद्रकोर... एक अनोखे आणि अतिशय सुंदर,शांत मिलन.... मनावरचा ताण क्षणार्धात दूर सारणारे. दिवसाप्रमाणेच आजची रात्रही विशेष स्मरणीय ठरली, ती या थंडीमध्ये पेटवलेल्या उबदार शेकोटीमुळे... तिच्याभोवती सादर झालेल्या नृत्यामुळे... बेभान होऊन सैराट गाण्यांवर नाचणाऱ्या आम्हा सर्वांमुळे... अवधूतच्या प्रेमाचा गंध असलेल्या कवितांमुळे... सरांच्या सुरेल आवाजात रंगलेल्या अंताक्षरीच्या मैफिलीमुळे.

या संपूर्ण महायज्ञात विशेष कौतुक करावेसे वाटते ते सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या क्रिएटिव्ह हेडचे.थर्माकॉलमधून निर्माण झालेल्या अक्षरांची जी सुंदर आणि भव्य कलाकृती अक्षरयज्ञात दिमाखात उभी होती त्याचे संपूर्ण श्रेय या सावंतवाडीच्या मुलांना. सरांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याचे मार्गदर्शनाचे ऋण त्यांनी ज्या पद्धतीने फेडले ते पाहून नक्कीच सरांच्याही डोळ्यांत दोन आनंदाची आसवे नक्कीच उभी राहिली असतील.ऋण म्हणण्यापेक्षा सरांबद्दल वाटणारे प्रेम होते ते.सरांच्या जीवनावर, कार्यावर  आधारित 'अद्वैत ' हा सुंदर माहितीपट आमच्यासमोर प्रस्तुत झाला तेव्हा साक्षात सरांबद्दल वाटणारा आदर मनात एका पायरीने आणखी उंचावला.जगातला कोणताही गुरु अशी गुरुदक्षिणा मिळाल्यास खरेच धन्य होईल.चांगल्या गुरुइतकेच चांगले शिष्य मिळणेही भाग्याचे असते. आणि या बाबतीत सर खरेच समृद्ध आहेत हे आज जाणवत होते.अच्युत पालव हे सुलेखनाच्या क्षेत्रात जितके नावाजलेले त्याहीपेक्षा अधिक माणूस म्हणून आदर्श व्यक्तिमत्त्व आहे असे मी म्हणेन. त्यांच्याकडून शिकण्यासारखे कॅलिग्राफीसोबतच आणखी बरेच काही आहे हे प्रत्यक्ष त्यांच्या संपर्कात आल्यानंतर अनुभवले.उत्तम संवादातून अधिकाधिक माणसं जोडत राहणं हा त्यांचा सर्वात मोठा छंद. आणि त्यामुळेच ते सर्वांचे लाडके बनले आहेत. स्वबळावर अवकाशापर्यंत हात पोहोचलेले असून सुद्धा पाय मात्र अजून जमिनीवरच टेकलेले आहेत... हे काहीजणांनाच जमते. सामान्यांसोबत सामान्य राहूनच असामान्य स्थान निर्माण करणे यांच्याकडून शिकले पाहिजे.मी या कलेच्या महासागरात सामावू पाहणारी एक सामान्य नदी...माझ्यातील उपजत कलागुणांना या विशाल विश्वात स्वैर साकारू इच्छिणारी. आज या महासागराचा एक भाग असल्याचा मनापासून खूप अभिमान वाटतो. अद्वैत म्हणजे साक्षात ब्रम्ह...ज्याचे दर्शन या महान कलाकाराच्या अभूतपूर्व कलाकृतीत प्रत्येक क्षणी घडते.त्याचेच एक सुंदर उदाहरण म्हणजे त्या क्षणी प्रस्तुत झालेले जन-गण-मन....अच्युत सरांच्या विश्वातून झालेले... सामान्यांच्या पलीकडले.

आज तिसरा म्हणजे या अक्षरयज्ञाचा शेवटचा दिवस. तिसरा दिवस सुरु झाला तो अरुंधती जोशी यांच्या व्हायोलिनवरच्या स्वरांसोबत. नवरसांचे अभूतपूर्व दर्शन आम्हाला त्या वाद्यस्वरांतून आज घडले... खरेच एक अद्भूत अनुभव. शांत रसापासून सुरु झालेले स्वर पुढे शृंगार , वीर ,हास्य रसांपर्यंत आमच्या मनांवर अधिराज्य गाजवत होते. आणि त्यांच्या सहवासात सर्वांनीच खूप छान काम केले, अगदी जे कालपर्यंत गोंधळलेले होते त्यांनी सुद्धा.... अशी रोख पावती अच्युत सरांकडून मिळाल्यावर सर्वानाच या कार्यशाळेत आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. नवनीतचे मालक श्री. अनिल गाला यांची तिथे उपस्थिती ही आमच्यासाठी विशेष आनंदाची बाब होती. त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच आज आम्ही सर्व हा अविस्मरणीय अनुभव घेऊ शकलो होतो. त्यांना आमचे काम पाहून कौतुकही वाटत होते आणि आनंदही. खरेच या सर्वासाठी त्यांचे आम्हा सर्वांच्या वतीने मनापासून विशेष आभार. खूप सुंदर आणि प्रेरणादायी कार्यशाळा अशी झरझर संपत चालली होती... पण तरी आज शेवटचा दिवस असूनही तसे मुळीच जाणवत नव्हते. उलट अंगी संचारलेला नव्या उत्साहामुळे कामाला आज खरी सुरुवात झाली असे माझ्याप्रमाणेच अनेक जणांचे मत होते. या दोन दिवसांत ज्या नवरसांना शोधण्याचा प्रयत्न करत होतो ते सारे आज कुठे जरा तरी समजूउमजू लागले होते, कागदावर उमटले जात होते.



शेवट समीप आला तसे आम्हाला सर्व रंग, साहित्य आवरून ठेवायला सांगण्यात आले. पण तरी त्या गोष्टीसाठी कोणीही तयार होईना. काम करण्यासाठी अजूनही उत्साही असलेल्या आपल्या सर्व मुलांना पाहून सरांनीही एका वेगळ्या पद्धतीत आम्हा सर्वांकडून आजचा शेवटचा स्ट्रोक मारून घेण्याचे ठरवले. प्रत्येकाने आपापले कागद एकमेकांशी जोडून एक सलग कागद थोड्या अवधीतच डोळ्यांसमोर निर्माण केला. सरांनी एक-दोन-तीन म्हणताच अरुंधती जोशींच्या वाद्यस्वरांच्या सोबतीत एकीने तिच्या कागदावर रंगाने भिजलेला फटकारा मारला...तिच्या शैलीत. जिथे तिचा वार संपला होता तिथे पुढच्या विद्यार्थ्याचा स्ट्रोक सुरु होऊन तो पुढच्या कागदापाशी येऊन थांबला. आणि अशाप्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याने मारलेल्या विविध शैलीतील , विविध रंगांतील स्ट्रोक्सचे एक सुरेख वलय निर्माण झाले.... तेही अवघ्या १५-२० सेकंदांत. या प्रयोगात सर्वानीच खूप आनंद लुटला. मुलांच्या म्हणण्यामुळे या प्रयोगाला वन्स मोर मिळाला. आणि दुसऱ्यांदा त्याहीपेक्षा सुंदर कलाकृती सर्वांनी घडवून आणली.

दुपारचे दीड वाजले. पॅलेट, ब्रशेस पाण्यात धुतले गेले . रंग सर्व बॅगेत बंद होऊ लागले.रंग उधळणारे हात आता आपापली चित्रे गोळा करून बांधून घेण्यात मग्न झाले होते. कुठेतरी फोन नंबरची देवाणघेवाण सुरु होती तर कुठे पुढच्या वाटचालीविषयी चर्चा. जेवणे झाली. ठरल्याप्रमाणे सर्वजण हॉलमध्ये पुन्हा एकत्र आली. आता तो हॉल कालपासून मांडलेल्या कागदांशिवाय,इथे अवतरलेल्या चित्रांशिवाय, रंगांशिवाय अपूर्ण वाटत होता. पण या अपूर्णतेला सुद्धा पूर्णत्त्वाकडे घेऊन जाणारा ऊर्जेचा , कलेचा स्रोत तिथे मध्यभागी उभा होता. सर्व विद्यार्थी अच्युत सरांभोवती गराडा घालून बसले... आता पुढे ते काय सांगतील या उत्सुकतेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकाच वेळी अनेक भाव गर्दी करत होते. सरांनी विचारले सुद्धा ," अरे काय झाले ? तुम्ही सर्वजण असे दिग्मूढ का दिसताहेत ? या प्रश्नाला एकमताने मिळालेले उत्तर ... 'मनात विरह रस वाहत आहे ' . खरेच ३ दिवसांत खूप जवळीक निर्माण झाली होती. कित्येक जणांनी ही कार्यशाळा ३ ऐवजी ५ दिवसांची का नाही अशी खंतही व्यक्त केली. खूप प्रश्न , खूप उत्तरे ,सल्ला मसलत झाली. आणि त्या संवादातून पुन्हा नवचैतन्याची कारंजे निर्माण झाले. सरांच्या हस्ते कार्यशाळेचे प्रमाणपत्र हाती घेताना समाधान व आनंद हे दोन्ही भाव एकत्र येत होते. संध्याकाळच्या समोसा पार्टीसोबतच या ३ दिवस सुरु असलेल्या कार्यशाळेची सफल सांगता झाली.


- रुपाली ठोंबरे

Wednesday, December 7, 2016

चौकोनातून बाहेर

एक भरपूर प्रशस्त आणि सोयी-सुविधांनी समृद्ध नाही पण छान, स्वच्छ हॉटेल(गोल्डन  वॅली रिसॉर्ट ,ठाणे ) ...पार्किंगसाठी बऱ्यापैकी जागा उपलब्ध, छोटेसे मैदान,एक स्विमिंग पूल... मुंबईतच म्हणून जवळच असल्याने सर्वांनाच बऱ्यापैकी ही जागा आवडली. आम्ही एकूण १४ जण.... रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आज नवे काही अनुभवण्यासाठी आणि फक्त मज्जा करण्यासाठी आलेलो. ऑफिसमधल्या रोजच्या त्याच त्या मिटींग्स, सॉफ्टवेअर्स,कोड, बग्स, क्लाएंट या सर्व गुंत्यात गुरफटून गेलेलो आम्ही आज बाहेर आलो होतो....एकाच टीमचे पण नेहमी आपल्या आपल्या कामात गुंग असणारे... एका टीम आउटिंग साठी....टीम-बिल्डिंग साठी.

गेले कित्येक महिन्यांपासून फक्त बोलण्यांत कधीतरी डोकावणारा प्लॅन एक आठवड्यापूर्वी रोजच्या संभाषणात येऊ लागला. आणि सर्वानीच उमेदीने आपापल्या परिने पुढाकार घेऊन त्या दृष्टीने आपापले मत मांडण्यास सुरुवात केली. कितीदा तरी मतभेद देखील झाले. पण सरते शेवटी एकदाचे एकमत झाले. एक जागा ठरली ... एक तारीख ठरली आणि आणि आज आम्ही त्या जागेवर सकाळीच एकत्र जमलो. न्याहारीची व्यवस्था हॉटेलमध्येच होती. पोहे, डोसा , ऑम्लेट अशा चविष्ट न्याहारीवर सर्वानीच एकत्र ताव मारला आणि मग मैदानात जमलो.

घरसंसाराच्या रहाटगाडयात सतत असणारे आम्ही आज काही वेळातच अगदी सहज बालपणात शिरलो. लगोरी, क्रिकेट अशा खेळांमध्ये अगदी चुरशीचा सामना रंगला.कधी एकमेकांशी भांडलो तर कधी समजूतदारीने एकमेकांना सांभाळूनही घेतले.टीम-बिल्डिंग म्हणजे नक्की काय असते? हेच तर असते... कितीही मतभेद झाले, भांडणे झाली तरी एकमेकांना सांभाळून घेणे. १ मिनिटाचे असे देखील अनेक खेळ झाले. अगदी एकमेकांना डोळे मिटून साडया नेसणे , टिकल्या चेहऱ्यावर लावणे, टाय बांधणे, एखाद्या उत्पादनाची जाहिरात करून दाखवणे, वेण्या घालणे असे कितीतरी प्रकार करायचे आणि तेही एक मिनिटात. खूप मज्जा आली. सर्वांचाच सहभाग कुठेतरी होत असल्याने कोणीही दुर्लक्षित राहिले नाही. इतके खेळून झाल्यावर आता पोटात कावळे ओरडायला लागले आणि आम्ही दुपारच्या जेवणासाठी पुन्हा डायनिंग एरियात आलो. शाकाहारी, मांसाहारी दोन्ही प्रकारचे स्वादिष्ट गरमागरम जेवण समोर हजर होते...सर्वानीच यथेच्छ ताव मारला. पिकनिकची सफलता त्या दिवसाच्या जेवणावर अवलंबून असते हे मात्र तितकेच खरे.

जेवणानंतर सुस्तावलेल्यांना ताजे करण्यासाठी डम्ब चॆरेड्स ची एक फेरी झाली. दोन्ही संघ आपल्या स्मरणशक्तीवर ताण देऊन कठीणात कठीण चित्रपटाचे नाव शोधून समोरच्याला हरवण्याचा प्रयत्न करत होते. यात ' दुल्हन वही जो पिया मन भाये' या कोणीही कधीही न ऐकलेल्या चित्रपटाने तर धमालच केली...आणि तो आता सर्वांना चांगलाच लक्षात राहील. लहानपणीच्या चमचा-निम्बू , तीन पायांची शर्यत अशा स्पर्धा आज खेळताना शाळेत स्पोर्ट्स डे मध्ये उभे आहोत कि काय असाच भास झाला. त्यानंतर स्वीमिंग पूलमध्ये पोहणार्यांनी पोहून तर इतरांनी नुसतेच पाण्यात खेळून मज्जा केली. नाचगाणे आणि पिकनिक यांचे जणू साटेलोटेच असते हे नाचणार्यांनी सिद्ध करून दाखवले ... पुढे इतके घरून उचलून आणलेले बॅडमिंटन उपयोगात यावे आणि वेळही उरला होता म्हणून त्यातही कित्येकांनी स्वतःला गुंतवून घेतले. शेवटी चहासोबत गरमागरम भजी आली आणि त्यासोबतच त्या मजेदार दिवसाचा आनंदात शेवट झाला.

संध्याकाळी ७ पर्यंत घरी परतलो पण आज येताना खूप काही घेऊन आलो असे वाटत होते. इतक्या वर्षांत हरवलेलं बालपण आज पुन्हा एकदा रांगत आयुष्यात आलं होतं. रोज भेटणाऱ्या सहकाऱ्यांसोबत एक नवे नाते निर्माण झाले होते. आयुष्याच्या एका वाटेवर मनाला ताजे करणारी अशी एखादी तरी पिकनिक असावी. आणि ती सतत आपले बालरूप घेऊन अधूनमधून समोर येत राहावी. जागा, इतर सोयीसुविधा महत्त्वाच्या नसून आपली आनंद लुटण्याची इच्छा किती प्रबळ हे अधिक महत्त्वाचे हे मात्र आज पटले. ऑफिसमधल्या त्याच चौकोनी वातावरणात रोज घुटमळणारा जीव कधीतरी अशा मोकळ्या हवेत मुक्त केला पाहिजे... मग बघा रोजच्या घुसमटीतही एक प्रकारचा नवा आनंद, समाधान अवचितच मिळू लागेल आणि त्यासोबतच आयुष्याचे कधीकधी कंटाळवाणे वाटणारे क्षणही हवेहवेसे होऊन जातील.


- रुपाली ठोंबरे.

Wednesday, November 30, 2016

एक विरंगुळा

लहान मुलं खरंच गोड असतात, पण त्यांच्यासोबत पूर्ण वेळ घालवला कि  खऱ्या अर्थाने समजते कि मुलाला सांभाळणे तेही त्याला न त्रास देता ,न रडवता, समजुतीने त्याला सांभाळून घेणे किती कठीण असते ते .कित्येक आपल्याच जगात व्यस्त असलेल्या पालकांसाठी तर कधीतरी ते डोक्याला तापही होऊन बसतात. आणि मग ते आईबाबा साथ घेतात टीव्ही ,व्हिडिओ, मोबाईल गेम नामक घातकी शत्रूची. त्यामुळे लहानपणापासूनच हे सर्व त्या बालपणीचे सवंगडी बनतात. हे सर्व नसतील तर काहीजणांच्या मते मूल सांभाळणे कठीणच. कारण थोडे चालते-फिरते मूल घरात असेल तर व्यवस्थित रचलेल्या घराचा पार कायापालट करायला तासभरही लागत नाही. सोफ्यावर चढ , उंच स्टूलावरून उडी मार ,किचनमध्ये रचलेली भांडी फेक, बाथरूममध्ये पाण्यासोबत खेळ असे एक ना अनेक उद्योग सतत घरात चालत असतात. कधीतरी काही नको ते तोंडात घालतील नाहीतर नको ती गोष्ट उचलून फेकून मारतील. बोलक्या मुलांना तर इतके प्रश्न असतात कि त्याची उत्तरे द्यायला साक्षात परमेश्वर खाली अवतरला तरी तोही एका क्षणी निरुत्तरित होऊन गप्प राहील. मग आपल्यासारख्या सामान्यांची काय व्यथा. एक वेगळीच जिद्द आणि चिकाटी असते त्यांच्यात.त्या गोष्टीचे कौतुकही असते पण हीच जिद्द जेव्हा नको त्या गोष्टीसाठी हट्ट बनतो सर्व नकोसेही होते.पण तरी शेवटी मुले असतात खूप निरागस, गोड... आजच्या धकाधकीच्या जीवनातसुद्धा आपल्याच बालविश्वात रमणारी आणि कधीतरी आपल्यालाही त्यांच्या कल्पनाविश्वात ओढून नेणारी.पण आजच्या जगात त्यांच्या त्या स्वर्गात जाण्यासाठी आपल्यालाच मुळी वेळ नसतो. आपणच एका विचित्र तांत्रिक जगात गुरफटून गेलो आहोत आणि सोबत या नव्या पिढीलाही गुंतवू पाहत आहोत असे म्हणणे अजिबात खोटे ठरणार नाही. 



आज असेच चित्र अनेक घरांत जरी दिसत असले तरी आमच्या घरी मात्र  किती तरी वेळा एक नवेच वेगळेपण असते, कलेच्या सानिध्यातले. त्या दिवशीही असेच झाले. आमच्या घरी देखील अडीच वर्षांचा असाच एक खोडकर कृष्णा आहे. एके दिवशी ऑफिसहून येताना एक खेळणे काय घेऊन गेले त्यानंतर पुढे रोजच मी बाहेरून येताच माझ्या पर्सची चांगली निरखून झडती घेतली जाऊ लागली. आणि नेमके त्या दिवशी आज चित्रकलेत काही वेगळा प्रयोग करून पाहूया या विचाराने मी पेंटींग रोलर घेऊन आले होते. नेहमीप्रमाणे झडती झाली. मुद्दाम ठेवलेला त्याचा आवडता बिस्किटाचा पूडा देखील आज दुर्लक्षित राहिला कारण त्याआधीच साहेबांच्या हाती तो रोलर लागला होता. एका क्षणात तो रोलर त्याची गाडी बनली होती आणि पलंगावरच्या अस्ताव्यस्त चादरीवर निर्माण झालेल्या दरी-डोंगरांवरून उड्या मारत धावत होती आणि त्याच्या प्रत्येक विचित्र हालचालीसोबत माझा जीव वर-खाली होत होता.मग काही वेळाने मलाच एक युक्ती सुचली. कपाटातून पोस्टर कलर घेतले, एक-दोन ब्रश उचलले आणि एक मोठा पांढराशुभ्र कागद घेऊन मी जमिनीवर ठिय्या मांडला. विविध गाडयांमध्ये गुंग असलेला तो आपोआपच जवळ येऊन बसला. मुलांना नवीन काही समोर आले कि त्याचे भारी आकर्षण असते. मग ती गोष्ट त्यांच्या कामाची असो वा नको, त्यांना ती काही केल्या हवी असते आणि आकाशपाताळ एक करून ते ती मिळवतात सुद्धा. तर ओम हा असा शेजारी येऊन बसला.... निश्चितच कशालाही हात न लावता शांतपणे तर नाहीच.आधी सर्व वस्तूंवर हात फिरवून झाला आणि मग जरा समाधानाने त्यातले काहीतरी एक घेऊन बसला. कधी मला पाहत तर कधी त्या वस्तू आणि कागदावर त्याची नजर. मीही  हिरवा रंग डिशमध्ये घेतला, सोबत थोडे पाणी मिसळले आणि हे हिरवे मिश्रण त्याच्या समोर ठेवले. एव्हाना आमची रोलर गाडी हातात तयारच होती. तिने लगेच त्या हिरव्या रंगात डुबकी घेतली आणि पुढची उडी थेट कागदावर. अर्थात ड्राइव्हर तो अडीच वर्षाचा चिमुकलाच. मग त्या नव्याकोऱ्या स्वच्छ मैदानात मनसोक्त गाडी चालवली आणि त्या मैदानावर क्षणात हिरवळीचे साम्राज्य पसरले. लहान मुलांचा मूळ स्वभाव... कोणतीही गोष्ट अधिक काळ ते झेलू शकत नाहीत. आता हिरवा रंग नको असा विरोध समोरून आला आणि मी सुद्धा  नवा रंग शोधू लागले. पण त्यानेच निळा रंग माझ्या हातात दिला- 'मला हा ब्ल्यू कलर हवा '. बहुतेक मुलांना निळा रंग लहानपणापासूनच आवडतो हे त्या क्षणी प्रकर्षाने जाणवले. 'ठीक आहे. निळा तर निळा...' म्हणत मी तो डिशमध्ये काढू लागले. आता त्याला रोलर पण कंटाळवाणा वाटू लागला. ही गोष्ट अगदी माझ्या मनासारखी झाली. लगेच रोलर बाजूला ठेवला आणि क्लेआर्ट चे साचे त्याच्यासमोर ठेवले... फुलपाखरू , टेडी बिअर,झाड ,मासा अशा कितीतरी आकाराचे साचे रंगात बुडवून त्यांचे निळे ठसे कागदावर उमटले. ते करण्यात मग्न असलेल्या ओमला मी पिवळ्या रंगात न्हाऊन निघालेला ब्रश हाती दिला. ठरल्याप्रमाणे त्याने त्या चित्रावर इथे तिथं स्ट्रोक्स मारण्यास सुरुवात केली. पूर्वीचा हिरवा आणि निळा रंग थोडाफार ओला असल्याने या नवीन पिवळ्या रंगाच्या सुंदर छटा सगळीकडे पसरल्या. कापसाच्या बोळ्याने केशरी रंगाचे सुर्यास्तासमयीचे ढगही त्या देखाव्यावर जमा झाले. पुढे त्या इवल्याशा बोटांना लाल रंग लावून त्या बागेत फुलांचा वर्षाव झाला. मध्येच काळा रंग वापरण्याची हुक्की झाली आणि त्यातूनच काळ्या ठिपक्यांचा पाऊस पडला. चित्रात बॅलेन्स नावाचा एक प्रकार असतो.कदाचित त्या चिमुकल्या मनाच्या कल्पनेतही तो असेल. पण शेवटी त्या चंचल मनाची स्थिरता आता संपू लागली. हाताच्या हालचालींवरचा ताबा आता सुटत होता. तसे मी ते सर्व रंग त्याच्याकडून काढून घेतले.नैसर्गिक नियमानुसार थोडी रडारड झालीच असती जर मी अचूक वेळी त्याला भेट म्हणून मिळालेले नवीन क्रेयॉन रंग त्याला दिले नसते तर. त्यातला आतापर्यंत चित्रात नसलेला चॉकलेटी रंग दिला. २ रेघोट्या मारून त्याने त्याचा मोर्चा पुन्हा काळ्या रंगाकडे वळवला. त्याच्या मनातली अस्थिरता त्या खरडण्यामध्ये पूर्णपणे दिसून येत होती. जितक्या रेघोट्या मला त्या चित्रात हव्या होत्या तितक्या पूर्ण झाल्यानंतर मी तो कागद त्याच्या हातून हळूच काढून घेतला. कधी कधी अनावश्यकतेच्या अतिक्रमणामुळे सुंदर चित्रही मिनिटभरात बटबटीत,कुरूप बनते हे सत्य अजून त्या बालमनाला काय माहित ? पण मोठ्यांना  ते कळते. पण तरीही खूपदा मोठ्यांकडूनही अशा काही चुका घडून येतात ज्या खरेच त्यांना लहानांकडून शिकता येण्यासारख्या असतात. 

लहान मुलं खूप छान असतात. निर्मळ, निरागस असतात.आणि हीच निरागसता ते खूपदा चित्रकलेच्या  माध्यमातून जगासमोर मांडतात. ज्या गोष्टी सांगता येत नाहीत ते चित्रातून सांगतात, फक्त त्या कळून घ्यायची मानसिकता आपल्यापाशी असायला हवी. पसारा मांडतील, रंग सांडतील, कदाचित भिंतीदेखील रंगतील. पण त्यातून त्यांना आणि त्यामुळे आपल्याला मिळणारा तो आनंद, समाधान वेगळेच असेल. योग्य तऱ्हेने आणि समजूतदारीने बरेच काही मिळवता येते.अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी ही निरागस बालके नेहमीच आपल्याला शिकवत असतात.पण आपल्याकडेच त्यांच्याकडून शिकून घेण्यासाठी वेळ नसतो किंवा ती मानसिकताच नसते. "मुले म्हणजे देवघराची फुले" असे  म्हणतात ते एका अर्थी खरेच आहे.या प्रत्येक मुलामध्ये एखादी कला उपजतच असते. तिला अचूक ओळखून खतपाणी घालणेही तितकेच महत्त्वाचे आहे जितके त्या फुलाला जपणे. नुसतेच मोठ्या मोठ्या फी भरून शाळा -क्लासेस मध्ये प्रवेश दिला म्हणजे आपले कर्तव्य पूर्ण होत नाही. त्यासोबतच त्यांना आपला वेळ , आपले मार्गदर्शन...सर्वार्थाने  आपण हवे असतो. त्यामुळे या सर्वांसोबतच आपल्या पाल्यांना प्रत्येक बाबतींत स्वतःचे विचार मांडण्याची थोडीशी मोकळीक आणि प्रोत्साहन प्रत्येक पालकाने द्यायला हवी असे मला तरी नेहमीच वाटते.एखादा विरंगुळा जोपासता जोपासता त्यातून काही शिकणं आणि शिकवणं म्हणजे प्रगतीच्या दिशेने पुढे टाकलेलं एक पाऊलच, नाही का ? थोडक्यात काय, मुलांचा गुंता सोडून बाहेर न पडता त्या गुंत्यात अडकून जायचं... आपोआप सगळं कसं छान सुटसुटीत होऊ लागतं. 

- रुपाली ठोंबरे.

Monday, November 28, 2016

कधी नव्हे ते आज पुन्हा एकदा...


कधी कधी जीवनात आलेल्या एखादया संकटामुळे माणूस अतिशय निराश होतो,निरस होतो,जीवनातील प्रत्येक गोष्टीतून त्याचे मन उठून जाते. अशा वेळी सर्वात जास्त राग येतो तो नशिबाचा आणि देवाचा. याच रागातून अगदी रोज करत असलेली गोष्टही तेव्हा करावीशी वाटत नाही. सर्वांपासून दूर जाऊ पाहतो. पण त्याने काहीही साध्य होत नाही. पण मग कधीतरी स्वतःसच केलेली चूक उमगते. उगाच केलेला राग अचानक विरघळतो. गोष्ट-आस्तिक नास्तिकतेची नाही पण सकारात्मक आणि शांत वातावरणात वेळ घालवण्याची आहे. जी निश्चितच कित्येकांना मंदिरात त्या अदृश्य शक्तीसमोर मिळते जिच्यावर ठेवलेला विश्वास एक प्रकारचे आंतरिक बळ देते सर्व संकटांवर मात करण्यासाठी.



   कधी नव्हे ते आज पुन्हा एकदा
   ती मंदिरात आली होती 
   कधीकाळी नास्तिक झालेली ती 
   आज आस्तिकतेच्या वाटेवर होती 

   इतक्या दिवसांतून आज प्रथमच 
   मंदिराचा सोन्याचा कळस तिने निरखून पाहिला 
   जणू तो टाचा उंचावून तिचीच वाट पाहत होता 
   इतक्या दिवसांतून आज प्रथमच 
   अभंगांचे स्वर तिच्या हृदयाशी थेट भिडले होते 
   एरव्ही तेही कानांपाशी येऊन दुर्लक्षित असायचे 
   आज मात्र तिने त्या परिचित हाकेला साद दिली 
   आणि कधी नव्हे ते आज पुन्हा एकदा
   या मंदिराच्या दगडी पायऱ्या ती चढत होती 

   प्रत्येक पायरीवर जुन्या आठवणी भेटत होत्या 
   चिघळलेल्या जखमा अचानकच भरल्या जात होत्या 
   कधीतरी आलेल्या अहंकाराची खपली आज दूर होती 
   अनुभवांमुळे आलेल्या अविश्वासाचा पदर दूर सारून 
   आशेने आज पुन्हा एकदा ती या मंदिरात आली होती

   दाराशी स्वागत करत होती तीच रांगोळी
   जणू समईची तीच वात अजून तेवत होती 
   पूर्वी वाहिलेली तीच फुले अजून दरवळत होती
   घंटेचा घुमणारा नाद अनोळखी वाटला नाही
   गाभाऱ्यातला देव पण आपलाच वाटत होता 
   खरेतर इतके घडून देखील तिच्या मनातला 
   भक्तीचा झरा अजूनही पूर्ण आटला नव्हता
   त्या तेजस्वी मुखावर ती स्वानंद शोधत होती 
   आशीर्वादासाठी धरलेली झोळी भरून घेत होती

   दोन्ही अंजली एकत्र आणून ती नतमस्तक होती 
   आशीर्वादाचे फूल मस्तकावर झेलून घेण्यासाठी
   प्रसन्न रागरंगात मनावर शांततेचे आता राज्य होते 
   सुखाच्या शोधात अंतरंग इथेच येऊन थांबले होते  
   स्वतःला शोधत कितीतरी वेळ आज ती मंदिरात होती 

   कधी नव्हे ते आज पुन्हा एकदा
   ती मंदिरात आली होती 
   कधीकाळी नास्तिक झालेली ती 
   आज आस्तिकतेच्या वाटेवर होती



              - रुपाली ठोंबरे.

Wednesday, November 16, 2016

अच्युत पालव... अक्षरांच्या राज्यावर अधिपत्य गाजवणारा एक किमयागार

एक सुदंर आणि फार मोठे राज्य होते. तिथे विविध भाषांतील आणि विविध अक्षरांतील असंख्य अक्षरे रहात  होती.देवनागरी, रोमन ,बंगाली ,अरेबिक ,जर्मन ,चिनी अशा कितीतरी देशी-विदेशी भाषा आणि त्यांना साथ देणाऱ्या लिपी समूह करून राहत होत्या...विविध प्रकारांमध्ये ,त्यांच्यावर लादलेल्या विविध बंधनांमध्ये. बंधने ... पूर्वापार चालत आलेली आणि ज्यांना ते सर्व निमूटपणे आपलेसे मानून आजपर्यंत पाळत होते.



एक दिवस तिथे एक राजा आला... अक्षरांचा राजा.गेली कित्येक वर्षे अशा प्रकारच्या कितीतरी ओळखी-अनोळखी अक्षरांमध्ये स्वतःला गुंतवून जगणारा, त्यांची ती मुग्ध भाषा नव्याने जाणणारा ,अक्षरांवर अगदी मनापासून प्रेम करणारा. त्याने जणू सर्व अक्षरांना आव्हान केले आणि ती सर्व एका विशाल व्यासपीठावर एकाच वेळी उतरू लागली. तो विशाल पण अदृश्य व्यासपीठ होता त्या राजाच्या मनाचा ,एका अनोख्या कल्पनाविश्वाचा. त्या विश्वात अक्षरांसाठी ना कोणते बंधन होते ना कोणते नियम. पूर्वापार चालत आलेली अक्षरमांडणी आज एक नवे रूप घेऊन अवतरली होती. 'प' च्या शेजारी 'भ' जाऊन बसला तरी आज त्याला तिथून कोणी उठवले नाही. स्वर-व्यंजनांसोबत काना,मात्रा ,वेलांटी,अनुस्वार सारेच एका विशिष्ट शैलीत नटले होते. पंधराव्या-सोळाव्या शतकात अस्तित्त्वात असलेली आणि काळाच्या ओघात कुठेतरी दडून बसलेली मोडीलिपीसुद्धा या राजाने पुरातन अवशेषांतून वर आणली... एखाद्या खोल डोहातून मोती शोधावा तशी. आज तिचे अस्तित्व जाणवू लागले तसे एकविसावे शतक सुद्धा एका वेगळ्याच ऐतिहासिक तेजाने झळाळू लागले. भावनेच्या शीत-उष्ण कारंज्यांतून चिंब न्हाऊन अक्षरांचे कितीतरी थवे त्या कोऱ्या पानावर एका मागोमाग एक झेप घेऊ लागले आणि त्या मानस-मंचावर सुरु असलेल्या कल्पनाविष्काराचे बिंब संपूर्ण जगासमोर अचूक प्रतिबिंबित झाले. त्या चित्त रंगभूमीवर रंगलेल्या खेळात आज कोणी कायम लहान नाही किंवा दीर्घकाळासाठी मोठाही नाही. कधी 'म' पौर्णिमेच्या चंद्रासारखा महत् असतो तर कधी हाच 'म' सूक्ष्म रूप धारण करून एखाद्या कौमुदीपरी शब्दनक्षत्रात चमकत असेल. मंद-तेजस्वी अनंत अक्षरचांदण्यांची अशी सुरेख मांडणी...अवकाशातील नक्षत्रालाही लाजवेल अशी... संबंध कागदावर अथांग पसरली आहे...जणू तारांगणच... रेखीव अक्षरांचे.

अशा जगातील कितीतरी भाषा,लिपी वेगवेगळे वळणे घेत , कमी-अधिक रेषांच्या सानिध्यात नव्याने उदयास आल्या ... अक्षरांच्या सुरेख पण वेगळ्याच शैलीतील रचनेला घेऊन. त्या अक्षरप्रेमी राजाच्या अधिपत्याखाली अशी सर्व अक्षरे एकोप्याने नांदू लागली.... ना कोणते जुने बंधन ना कोणते जुने तेच ते कंटाळवाणे नियम .... पण एक शिस्त कायम ध्यानी बाळगून. शिस्त... त्या राजाच्या मनात आखलेल्या रचनात्मक आराखड्यावर पाऊल ठेवून अचूक रितीने पुढे चालत राहण्याची.

त्या राजासाठी तर या अक्षरांची अशी जुळवाजुळव आणि आखणी म्हणजे एक प्रकारचे ध्यानच... मन शांत ठेवणारे ,स्वतःचा स्वतःशीच परिचय करून देणारे , भावनांना एका निर्जीव कागदावर उतरवून एक जिवंत चित्र समोर उभारणारे , मुग्धपणे इतर मनांशी संवाद साधणारे, एका वेगळ्याच विश्वाशी स्वतःला जोडणारे.
म्हणूनच कि काय त्या राजाच्या दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या अक्षरांना पाहताना लाखों दीप प्रज्वलित होऊन आपल्या यश आणि सुखसमाधानाची कामना करत आहेत असा भास अचानकच त्यावेळी झाला.कधी त्या जादुई हातांतून कागदावर उमटलेल्या प्रेमकवितेतून स्वच्छंदपणे हिंदोळे घेत डुलणारी प्रीत डोकावते तर कधी सावधतेचा इशारा देणारे शब्द स्तब्ध करतात . कधी फुलांच्या आशयातून नकळत सुगंध अवतीभवती दरवळतो तर कधी मधुर सुभाषिताचे बोल मनात उत्साहाचे कारंजे निर्माण करतात. या जादूगाराच्या हातून सादर होणाऱ्या अशा कितीतरी अक्षरांचा ,त्यांच्या मांडणीचा उलगडा हे कायम त्याच्या चाहत्यांच्या मनात एक रहस्य असेल. पण तरी कागदावर उमटणाऱ्या त्या विविधरंगी , विविधढंगी लहानमोठ्या फुलपाखरांना असे एकाच वेळी बागडताना पाहताना मनाला मिळणारा  आनंद एक वेगळीच उत्सुकता आणि उत्साह देऊन जातो... हाच आनंद निरंतर या अक्षरांच्या राजाकडून आम्हां सर्वांना मिळत राहावा हीच सदिच्छा.



- रुपाली ठोंबरे.

Wednesday, November 9, 2016

अचानकच झालेला एक बदल...

नशीब कधी कोणाचे 
कसे फिरेल हे सांगणे 
साक्षात परब्रम्हालाही 
होऊन जाते अशक्य 

आता आजचेच पहा ना 
ज्या ५००,१०००च्या नोटांना 
इतके दिवस मानाने 
प्रत्येकाने मिरवले होते,
आज निपचित  पडून  होत्या 

ज्या आजपर्यंत हव्याहव्याशा 
आज मात्र झाल्या नकोश्या
कालपर्यंत कुणासमोर धरली 
कि आनंद झळकायचा चेहऱ्यावर 
आज मात्र तिला पाहताच 
विचित्र आठ्या पडतात कपाळावर 

आजपर्यंत मागे राहिलेली 
शुल्लक नाणीसुद्धा आज 
दिमाखात व्यवहारात आली 
जो आज चालतो तोच आवडतो 
ही दुनियेची रित पुन्हा अनुभवली 

अचानकच झालेला एक बदल 
क्षणात आयुष्य पालटवून जातो 
नशिबाचा खेळ "आज आहे  उद्या नाही 
आज नाही उद्या असेल " चालूच राहील 


-  रुपाली ठोंबरे .



Monday, November 7, 2016

आजच्याच दिवशी

( वाढदिवसाच्या शुभेच्छा.....गोजिऱ्या पाखरासाठी )


तुझ्या इवल्याशा पावलाने 
आजच्याच दिवशी 
या अंगणात 
सुखांचा सडा शिंपला होता 

तुझ्या इवल्याशा हातात 
आजच्याच दिवशी 
माझी करांगुली 
प्रेमाचे बंधन गुंफत होती 

तुझ्या किलकिलणाऱ्या डोळ्यांनी 
आजच्याच दिवशी 
तू आईबाबांना तुझ्या 
मन भरून हसताना पाहिले होते 

तुझ्या नाजूक स्पर्शात 
आजच्याच दिवशी 
आपल्या कुटुंबाला 
नवे खोडकर नाते गवसले होते 

आज इतक्या वर्षांनी 
आजच्याच दिवशी 
तुला शुभेच्छा देताना 
नवजात तू,नकळत आठवणींत येतो

तेव्हापासून प्रत्येक वर्षी
आजच्याच दिवशी
माझा आशीर्वादाचा हात 
नकळत तुझ्या मस्तकी टेकतो 


- रुपाली ठोंबरे. 

 

Thursday, November 3, 2016

यशपूर्तीसाठी मार्गदर्शक... हवा कि नको ?

काल अचानकच पडलेला प्रश्न...आयुष्यात स्वतःचे ध्येय आणि त्यासाठी लागणारा रस्ता स्वतःच शोधायचा कि आपले ध्येय साध्य करण्यासाठी एखाद्यावर अवलंबून राहायचे, वेगळ्या अर्थात सांगायचे तर आपले ध्येय साध्य करण्यासाठी एखाद्याची मदत घ्यायची कि घेऊ नये.

घड्याळाचा मिनिटकाटा कितीदातरी इतर दोघां मित्रांना भेटून जात होता पण माझ्या प्रश्नाच्या दोन्ही बाजू काही केल्या एकत्र येऊन एखादे ठोस उत्तर देत नव्हत्या. तर दोन्ही गोष्टींचे समान फायदे-तोटे. कधी वाटते कि ध्येय आपले तर त्यासाठी इतरांचा काय संबंध, इतरांना का त्रास,त्यांच्या विचारांच्या बंधनांचे ओझे कशाला ... पण मग वाटते फक्त आपल्याच एका डोक्यातून निघणाऱ्या कल्पनांपेक्षा एखाद्या अनुभवी व्यक्तीचे विचार सोबतीला एकत्र आले तर त्या ध्येयाशी पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग नक्कीच मिळेल.

समोर फक्त पर्वतशिखर दिसते आहे पण जाणारा योग्य रस्ता समजत नाही. काय करणार? तिथेच धीर खचून तर चालणार नाही. पण प्रयत्न केला तर एखादा मार्ग नक्कीच नजरेस पडेल. ते उत्तुंग शिखर सर करण्यासाठी तोच रस्ता घेऊन पुढे चालू शकतो. पण कधीकधी होते काय कि एखाद्या नव्या वळणावर त्या रस्त्याला २ फाटे फूटतात. आता यापैकी एकाची निवड करणे तर भागच असते. मग आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवून त्यांतील एका रस्त्याला आपण आपला साथी बनवतो. पुढे हा साथी कधीकधी चुकीचाही ठरतो किंवा आपला अंदाज अचूक आणि नशीब बलवत्तर असेल तर बरोबरही. बरोबर मार्गावर असू तर ठीक पण चुकून मार्ग चुकला कि मग डगमगायला होते. मग अशा वेळी एखाद्या अनुभवी मार्गदर्शकाची गरज नकळत जाणवते.कधीकधी योग्य मार्गदर्शन ही यशाची एक किल्ली आहे असे म्हणण्यासही हरकत नाही. पण स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा मार्ग अवलंबलेला असेल तर थोडे आड वळणे घेत भरपूर सारे अडथळे पार पाडत पुढे चालत राहतो. त्या शिखरापर्यंत पोहोचेपर्यंत त्याने कितीतरी प्रयोग यशस्वी पार पडले असतात त्यातून प्रत्येक पावलाशी नवे काही शिकून त्याचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला असतो.याउलट सुरुवातीपासूनच मार्गदर्शक निवडला तर आपले सर्वस्वी यश तो किती योग्य आहे यावर अवलंबून असते. जर त्याला निवडण्यात आपली चूक झाली नसेल तर आपण नक्कीच शीघ्र गतीने शिकत टोकाशी पोहोचू शकतो. असा मार्गदर्शक आपल्या बुद्धीची आणि कर्तृत्त्वाचाही योग्य वापर करून आपल्याला सबळ बनवतो यात यत्किंचितही शंका नाही. पण त्यातही तो जिथे थांबेल तिथे विश्रांती घेणे ,त्याच्या तत्त्वांच्या बंधनात राहणे हे ओघाने आलेच. कित्येकदा हे आपल्या चांगल्यासाठीही असू शकते. आपल्या शिष्याला योग्य रितीने समजून घेऊन निस्वार्थीपणे योग्य मार्गदर्शन करणारा गुरु मिळणे म्हणजे भाग्यच.

अशा दुहेरी विचारांमध्ये मन अडकले असतानाच आज सकाळी बाबा आमटेंचा एक सुविचार दृष्टीस पडला ,


" दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली कधीच बनवू शकत नाहीत , त्यासाठी एकटयाला उन्हात उभे राहावे लागते. "
हे तर १००% खरे आहेच पण त्यासोबतच एका उत्तम मार्गदर्शकाची निश्चितच गरज असते असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते?



- रुपाली ठोंबरे


Monday, October 24, 2016

मोगरा फुलू दे

त्या दिवशी सहज  मैत्रिणीकडे गेले होते. तिच्या गॅलेरीतल्या छोटयाशा फुललेल्या बगिच्यातून आत डोकावणारी मोगऱ्याची एक टुम्म फुगलेली पांढरीशुभ्र कळी पाहिली आणि आतापर्यंतच्या वर्षांची कितीतरी पाने झरझर उलटत मी थेट माझ्या बालपणात शिरले.




अशीच टपोरी कळी होती ती....थोडीशी पिवळसर छटा असलेली पण शुभ्र... हिरव्यागार पानांतून उत्सुक असलेल्या आम्हां भावंडाना हळूच पाहणारी.... जरा जरी धक्का लागला कि लगेच त्या हिरव्या रानात जाऊन लपून  बसणारी . अजूनही आठवते - बाबांनी वसंत ऋतूच्या प्रारंभीच नव्या घरी आणलेले ते इवलेसे पहिले रोप... छोट्या छोट्या पानांनी नटलेलं आणि त्यांत ही पांढरीशुभ्र टपोरी चंद्रकोर. मी पाचवीला असेल तेव्हा आणि भाऊ जेमतेम ५ वर्षांचा. आता ही कळी कधी फुलेल ? कधी तिचा मंद सुगंध घरभर पसरेल ? नवीन कळी कधी येणार ? एका वेळी अशा किती कळ्या येतील ? उमलणार फूल कसे दिसेल ? मग मी ते तोडू शकणार का ? पहिल्या फुलाचे काय करायचे ?.... असे एक ना हजार प्रश्न विचारून आम्ही आईबाबांना भंडावून सोडले होते. पण दोघांनाही आमच्या त्या चिमुकल्या प्रश्नांचे कौतुक वाटायचे. आई लडिवाळपणे जवळ घेत म्हणायची ,

          " बाळांनो, हे रोप आता तर आपल्या घरी आले आहे. त्याला जरा विश्रांती घेऊ दया. रोज थोडे खतपाणी आणि सूर्यप्रकाशाची किरणे हवी तशी मिळाली कि मग बघा कसे ताजे होईल. आता या एवढयाशा प्लास्टिकच्या पिशवीत त्यांची मूळे आकसून अडकून गेली असतील, घरातल्या या कोंदट हवेत जीव गुदमरत असेल त्याचा... म्हणून जरा कोमेजल्यासारखे वाटतेय.उद्या सकाळीच बाहेरच्या कुंडीत आपण लावू... मग तुम्ही दोघांनी छान काळजी घ्यायची बरं का त्याची...मग पहा, एक दिवस या कळीचे कसे छानसे फूल होईल.... अगदी सुंदर आणि सुगंधी.आणि या पहिल्या पुष्पाचे काय कराल? तर आपण ते देवापुढे अर्पण करू ... पुढे कितीतरी फुले येतीलच की माझ्या छकुलीच्या केसांत माळून घेण्याकरता. "

ती रात्र तर आम्हांला झोपच लागली नाही. सारखे त्या नवीन पाहुण्यांकडे आमचे लक्ष. पानांच्या पसाऱ्यात एका देठाच्या कडेवर बसलेल्या त्या चिमुकलीचे एक आगळेच आकर्षण. पहाट झाली आणि आम्ही अगदी सकाळीच आईला त्या उद्योगाला लावले. आता आमचे ते इवलेसे रोपटे मातीत अगदी धीटपणे उभे होते... वाऱ्याच्या झुळूकीबरोबर स्वच्छंदपणे डोलणाऱ्या फांदीवरची ती कळी आनंदाचे झोके घेत होती. पहाटेच्या थंडाव्यात आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात तिचे रूप आणखी मोहक वाटू लागले. कधीतरी बरसणाऱ्या रिमझिम पावसाला झेलून घेत एखादा सप्तरंगी हिरा तिच्या माथी विराजमान व्हायचा... तेव्हा ती जणू या निसर्गाची राणीच भासायची. राणी...इवली राजकुमारीच ती... आम्हा चिमुकल्यांच्या दो बालमनांवर अधिराज्य गाजवणारी. सकाळ-संध्याकाळ...  अगदी भर दुपारी आणि रात्रीच्या अंधारातही आम्ही सतत तिच्या सोबत असायचो...तिला न्याहाळायचो ,तिच्यासोबत बोलायचो , तिची सर्व परीने काळजी घ्यायचो.... तीही अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यायची...मनापासून हसून आणि अशाप्रकारे हसताना पडणाऱ्या प्रत्येक खळीसोबत तिच्या चेहऱ्यावरची एकेक पाकळी या सृष्टीला,आम्हाला पाहण्यासाठी बाहेर डोकावू लागली...आणि पाहता पाहता एक दिवस तीचे रूपांतर एका टपोऱ्या फुलात झाले... अगदी आईने सांगितले होते तसे... एक छानसे फूल... अगदी सुंदर आणि सुगंधी.आमचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. 

आम्ही घाईघाईतच हव्याश्याप्रमाणे त्या फुलावर झडप घातली... नाजुकसे फुलच ते....तेही क्षणभर बावरले असेल,गोंधळले असेल आणि फांदीपासून विलग होताना, आमच्या हातांवर झेप घेताना त्याचाही तोल गेला असेल... ते निसटले, हातातून खाली पडले...ते थेट खाली वाहणाऱ्या पाण्यामध्ये. आणि आमच्या डोळ्यांसमोर ते त्या प्रवाहात वाहून चालले होते... थांबण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना त्या प्रवाहनलिकेच्या कडांना कितीदातरी आपटले जात होते... आम्हाला एकटक पाहत होते, जणू आकांत करून सांगत होते कि, तुमच्यामुळे...आज तुमच्यामुळे इतका सुंदर जन्म मिळूनही मी हा असा सांडपाण्यात तुच्छ होऊन वाहून चाललो आहे. काही क्षणांतच इतक्या दिवसांपासून ज्याची वाट इतक्या आतुरतेने पाहिली होती ते अशाप्रकारे हाती आल्यानंतर नजरेआड झाले आणि आम्ही खूप हिरमुसून गेलो.मग नेहमीप्रमाणे आईने समजूत काढली आणि आम्ही दोघे नव्या कळीची वाट पाहण्यात आमच्या दिवसाचा अख्खा वेळ घालवू लागलो.  

खूप दिवस असेच गेले.पाऊसरेघा आता अधिकाधिक दाट होऊ लागल्या. दिवसेंदिवस पाऊस वाढू लागला आणि एकेक कोवळी पोपटी पालवी एखाद्या नवजात पक्ष्याला नवे पंख फुटावे तशी मऊ पिसापरी त्या फांद्यांवर जन्मू लागली. पण त्या नव्या कळीचा शोध काही केल्या लागेना आणि आमच्या जीवांची घालमेल काही संपेना. पण मग एके दिवशी अचानकच अगदी हवेहवेसे घडले. एकाच फांदीवर एक नाही तर चक्क दोन कळ्या दिमाखात आपले डोके वर काढत होत्या. ते पाहिले आणि आमच्या आनंदाला भरतीचे उधाण आले. पुन्हा एकदा आमचा तोच दिनक्रम सुरु झाला... कळीपासून ते फुलापर्यंतचा प्रवास. त्या प्रवासात एकदा पावसाच्या एका जोरदार तडाख्याने आम्ही एक कळी न उमलताच गमावली पण आम्ही हार मानली नाही... उलट दुपटीने त्या नव्या कळीची काळजी घेऊ लागलो. शेजारच्या मावशी त्यांची उमलती गुलाबाची कळी फुले तोडणाऱ्या वात्रट लोकांपासून वाचवण्यासाठी एक नाजूक पिशवी त्या भोवती बांधत. आम्ही तीच युक्ती पाऊस वाऱ्यापासून आमच्या छकुलीला वाचवण्यासाठी करत होतो. शेवटी पुन्हा एकदा तो सुंदर दिवस उजाडला जेव्हा ते सुंदर सुगंधी फूल आपले सर्व शुभ्र पंख भोवताली पसरवून आनंदात हवेसोबत डुलत होते. यावेळी मात्र आम्ही दोघे खूप शहाणे झाले होतो. तो हसणारा मोगरा त्या फांदीवरच पाहण्यात आज जन्माचे समाधान मिळत होते. नंतर आईने सांगितल्याप्रमाणे ते फूल हळूच त्या झाडापासून खुडले आणि देव्हाऱ्यातल्या उच्च स्थानी सजवले. निरंजनांच्या केशरी-पिवळसर ज्योतींमध्ये देवीच्या मुकुटात विराजमान झालेला मोगरा सोन्याच्या रंगात प्रकाशत होता. गालाशीच खुद्कन हासत मला कोटी कोटी धन्यवाद देत होता. यातून मिळणारे अनंत सुख खरेच अवर्णनीय होते. 

पुढे एक-दोन ... दहा-पंधरा अशी कितीतरी फुले त्या झुडूपवजा वेलीवर एकाच क्षणी फुलून यायची. नव्या फुलाबद्दलची उत्सुकता काही अंशी कमी झाली असली तरी त्यांच्याबद्दलची आपुलकी अजून तशीच होती. वसंत ओसरला... दिवाळी आली तेव्हा रांगोळीच्या दहा रंगांमध्ये आणि दिव्यांच्या शंभर ज्योतींमध्ये शेजारीच उमललेला पांढरा मोगरा त्याच्या सुगंधाने भाव खाऊन जायचा. आणि मीही इतर सर्व रंग डावलून त्या पांढऱ्या रंगाला, त्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या सुगंधाला विशेष मान द्यायचे...तो गंध... मन पवित्र करणारा... आनंद देणारा...आठवणींना सोबत आणणारा.... 

हवेची एक गार झुळूक गॅलरीतून सोफ्याजवळ आली... ती तोच हवाहवासा गंध घेऊन. आज किती वर्षे उलटून गेली.... यांत किती उन्हाळे-पावसाळे गेले... कितीतरी मोगरे पाहिले, हुंगले, माळले..... पण आजही मोगरा म्हटला कि आठवते ते वर्षांपूर्वी घरी अवचित आलेले इवलेसे हिरवे रोपटे आणि त्यावर नांदणारी ती शुभ्र लाजरी कळी...हवेवर डुलणारी, जलप्रवाहात समाधी होऊन दूर जाणारा जीवनातला पहिला मोगरा, देवांच्या सहवासात राहून निर्माल्य झालेला तो नशीबवान मोगरा,मोगऱ्याच्या शुभ्र फुलांच्या ताटव्यांनी डवरलेलं झाड, पुढे पानगळ होऊन निपचित पडलेलं तेच क्षुद्र झालेलं वृद्ध झाड...त्या काड्याही कितीतरी महिने त्या कुंडीत मोठ्या धिटाईने उभ्या होत्या... एका नव्या आशेवर... नव्या पोपटी पिसाच्या... कोवळ्या कळीच्या... आणि त्यातून उमलणाऱ्या शुभ्र सुगंधाच्या. पण छे ! जीवनाच्या एका वाटेवर आयुष्य संपते आणि उरतात ती फक्त हाडे... स्तब्ध उभी राहून आठवणींचे पुतळे बनलेली. 

अशी कितीतरी रोपटी आणि त्यावर उमललेली मोगरे, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक वाटेवर असतात. त्यांना नात्यांच्या पवित्र बंधनात गुंफताना निर्माण होणारा आनंद मी कितीदातरी अनुभवलेला आहे. तुम्ही कधी अनुभवला आहे का ?... जर नाही तर अजूनही वेळ गेली नाही... एकदा जवळ जाऊन पहा... कदाचित रोपटे अजून हिरवेगार असेल... त्यावर अजूनही नवी पालवी फुटू शकते... प्रेमाचा गंध दरवळू शकतो... गरज आहे ती फक्त काळजीची, एका मृदू स्पर्शाची, आधाराच्या खतपाण्याची आणि आदरातुन निर्माण होणाऱ्या प्रकाशाची. 

- रुपाली ठोंबरे .


Monday, October 3, 2016

डोळ्यांत तुझिया




पुष्प आभूषणांची शृंखला 
सजली दिव्यांची उजळ मेखला 
रूप साजिरे घटी देखणे 
जशी आकाशी उजळ चंद्रकला 

निरांजनांच्या दो वाती तेजस्वी 
प्रसन्न चेहऱ्यावर सूर्य दो मनस्वी 
शीत-उष्ण भाव किती बोलके 
त्रैलोक्य सामावून उजळल्या ज्योती 

डोळ्यांत तुझिया वाहे प्रेमकरुणेच्या सिंधू-गंगा 
या नयनांच्या प्रकाशप्रवाहें उजळ मम् अंतरंगा 
डोळ्यांत माझिया भक्तिसंगे साठले रूप तुझे माते 
डोळ्यांत तुझिया मंत्रमुग्ध मी रंगले सर्वांगा 


- रुपाली ठोंबरे.

Tuesday, September 20, 2016

रे परतीच्या पावसा...


भर दुपारी अचानक
आभाळ सारं भरून आलं
नुकतंच उजळलेलं जग 
पुन्हा एकदा अंधारून आलं
पण मला नवल वाटलं नाही

कारण हे आता तुझं रोजचंच झालंय... 
दिवसाच्या अवचित वेळी 
तुझं हे असं वर्दी न देता बिनधास्त येणं  
आणि तसंच न सांगता गुपचूप निघून जाणं
कधी धुवांधार चारपाच सरींतच गडप होणं  
तर कधी रिमझिम तासंतास बरसत राहणं
कधी एकसूरी सौम्य रागात निमूट आळवणं 
तर कधी ढोल ताशांत दिमाखात गर्जत येणं 

पहिल्यांदा आला होतास 
तेव्हा हेच सर्व कसं हवंहवंसं वाटत होतं 
तळहातावरचा तुझा तो पहिला स्पर्श 
अंगावर उठलेला तो पहिलाच शहारा 
याच स्पर्शातून जन्मलेला तो मंद गंध
जुन्या आठवणींना आठवून त्यांत भिजताना
ओलं झालेलं , आनंदलेलं  ते चिंब मन 
नव्या पावसासोबत पाणावलेल्या डोळ्यांत
निर्माण होणाऱ्या त्या नव्या मुग्ध आठवणी
सारंच कसं साठवून घ्यावसं वाटत होतं  

हळूहळू सर्व जणू  बदलून गेलं 
सगळीकडे होतास फक्त तूच तू 
कोवळ्या पालव्यांतून डोकावणारा तूच तू 
धबधब्यांतून उडया मारणारा सुद्धा तूच तू
हिरव्या बनात मोराला नाचवणाराही तूच 
आणि चातकाची तहान भागवणाराही तूच 
नद्यांमध्ये खळखळ वाहणारा तू 
रानांमध्ये सळसळ नांदणाराही तूच तू 
जिकडे तिकडे चोहीकडे कोसळणारा तू 
मग रोजचाच सखा झालास रे एकदम

थेंब थेंब रुपेरी रांगांनी 
आता मी चिंब भिजले आहे 
ओल्या तळहातांवर पुन्हा पुन्हा 
झेलताना तेच पाणी 
स्पर्श जणू आता स्तब्ध निजले आहेत 
हळूहळू मग बघ सवयच झाली तुझी 
तुझं असं हे येणं-जाणं ओळखीचं झालं 
छत्रीशिवाय घराबाहेरचं जग 
अचानक अनोळखी वाटू लागलं 
कधीतरी हवाहवासा वाटणारा तू 
मग कधीतरी नकोसाही झालास 
नद्या धरणे दुथंडून वाहू लागल्यावर 
अक्राळविक्राळ पुरातही दिसलास तू 

काही काळातच संबंध हिरवा रंग उधळून 
रंगहीन थेंबांतून नभी इंद्रधनू रेखाटलंस तू
मध्येच कधीतरी लपाछुपीचा खेळ तुला सुचला
तुझ्या या ऊनसावलीच्या खेळात जीव मात्र दंगला 
आज पुन्हा ना जाणे का पण तुझ्यात जीव रंगला 
रे परतीच्या पावसा, कोसळत राहतो जरी दिवसभर 
निरोप घेताना तुझा जीव कासावीस होतो रे क्षणभर 
माहित आहे मलाही, येशील तू पुन्हा एकदा न चुकता
फक्त वेळेवर ये, ती पहिल्या पावसाची जादू पुन्हा घेऊन

- रुपाली ठोंबरे






Blogs I follow :